जगभरात कोरोनाने अक्षरश: कहर केला आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, तरी देखील महाराष्ट्रातील संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आतापर्यंत २३ हजार ४०१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, असे असताना देखील अनेक जण संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. अशा व्यक्तींविरोधात धडक कारवाई करत महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल ४ कोटींचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३ कोटी ९७ लाख ८७ हजार ६४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
As many as 1,04,449 offences regd. u/s 188 of IPC since the lockdown leading to 19,838 arrests & seizure of 56,473 vehicles.
₹3,97,87,644 have been collected in fines from offenders.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 12, 2020
१९ हजार ८३८ जणांना अटक
लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळा. गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, असे असताना देखील अनेकांनी नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये १९ हजार ८३८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ५६ हजार ४७३ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
अवैध वाहतुकीची प्रकरणे
लॉकडाऊनच्या काळात अवैध वाहतुकीची १ हजार २९१ प्रकरणे समोर आली आहेत. तर पोलिसांवर हल्ले झाल्याच्या २१२ घटना घडल्या आहेत. याप्रकरणी ७५० जणांना अटक करण्यात आली आहे. तर सध्या राज्यात २ लाख ५८ हजार ७९२ जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. त्यापैकी ६६३ जणांनी क्वॉरंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.
हेही वाचा – चाकरमान्यांची एसटी डेपोकडे गर्दी