भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची तहसीलदार म्हणून रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे नियुक्ती करण्यात आली आहे. क्रीडा या कोट्यातून त्यांची निवड झाली आहे. त्या राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू आहेत. माण तालुक्यातील मोही गावच्या कन्या ललिता बाबर यांनी त्यांच्या कौशल्याच्या ाणि जिद्दीच्या बळावर जगात देशाची मान उंचावली आहे.
ललिता बाबर या सुरुवातीसल खो-खो खेळायच्या. त्यावेळी त्यांच्या चपळपणा लक्षात घेता शिक्षकांनी त्यांनी धावण्याकडे वळविले. पंधराशे मीटर शर्यत ते मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तमजूर कुटुंबातील या खेळाडूने जिल्हा स्तरावरील शालेय मैदानी स्पर्धांमध्ये मध्यम व लांब अंतराच्या शर्यतींमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवले. त्यानंतर त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला. सातारा जिल्ह्यातील माण परिसरात असलेल्या मोही या छोटय़ाशा खेडेगावात जन्मलेल्या ललिता बाबर जागतिक स्तरावर पिटी उषा आणि कविता राऊत यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेल्या खेळाडू आहेत.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीने (फिक्कीने) आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने २०१५ ला बाबर यांना स्पोर्ट्स पर्सन ऑफ दी ईयर पुरस्काराने सन्मानित केले.त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. शासनाने त्यांना यापूर्वीच सेवेत घेतलं आहे . सध्या त्यांचा परिविक्षाधीन कालावधी सुरू आहे. २७ नोव्हेंबरला माणगावच्या तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे.