सांगली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या असल्या तरी अद्यापही मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. मागील दोन महिन्यापासून मविआमध्ये जागावाटपासंदर्भात बैठका होत आहेत. परंतु, तरी देखील मविआत कोणता पक्ष किती जागांवर निवडणुका लढवणार? हे अद्यापही निश्चित होऊ शकलेले नाही. पण आता याच जागावाटपाच्या मुद्द्यावरून मविआत वादाची ठिणगी पडली आहे. विशेषतः सांगली लोकसभा मतदरासंघामुळे मविआत वाद निर्माण झाला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. (Sangli Lok Sabha sparks controversy in Mahavikas Aghadi, Nana Patole expresses displeasure)
हेही वाचा… Loksabha 2024: शिर्डीत उद्धव ठाकरेंना धक्का; भाऊसाहेब कांबळेंचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सांगली येथील सभेतून ठाकरे गटाकडून उमेदवाराची घोषणा केली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता चंद्रहार पाटील प्रचाराला लागले आहेत. पंरतु, उद्धव ठाकरेंच्या याच घोषणेनंतर महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असून अशा पद्धतीने नाव जाहीर करणे योग्य नाही, असे नाना पटोले यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
याबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करणे हे अडचणीचे झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये हे व्हायला नको. एकीकडे चर्चा चालू असताना दुसरीकडे त्या जागेवर नाव जाहीर करायला नको होते. उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीने नाव जाहीर करणे योग्य झालेले नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.
काल उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील मिरजच्या सभेतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केली. डबल महाराष्ट्र केसरी हेच सांगलीतील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, असे सांगितले. मी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करतो. चंद्रहार पाटील दिल्लीत जाणार आहे. मी इथे एक मर्द दिला आहे. त्याला जिंकून देण्याचा मर्दपणा दाखवा, असे उद्धव ठाकरे यांच्याकडून भरसभेत सांगितले. परंतु. या जागेवर काँग्रेसकडूनही दावा करण्यात आला आहे. सांगली हा आमचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आम्ही ती जागा सोडणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. मात्र, आता उद्धव ठाकरेंनीच या मतदारसंघात उमेदवार घोषित केल्याने मविआत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.