संतोष परब हल्लाप्रकरणी (Santosh Parab Attack Case) भाजप आमदार नितेश राणे (Bjp MLA Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावला आहे. यापूर्वी जिल्हासत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंना कोणताही दिलासा दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून शरणागतीसाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे नितेश राणेंची अटक अटळ असून येत्या १० दिवसांत नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण यावे लागणार आहे.
Supreme Court grants 10 days protection from arrest to Maharashtra BJP MLA Nitesh Rane and directs him to surrender before the trial court and seek regular bail in connection with an attempt to murder case lodged in Sindhudurg district last month.
(File pic) pic.twitter.com/i3uCUSCnAb
— ANI (@ANI) January 27, 2022
संतोष परब हल्लाप्रकरणी काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. आज सर्वोच्च न्यायालयात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी नितेश राणेंच्या वतीने युक्तीवाद केला. तर सरकारच्या बाजूने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. या युक्तीवादादरम्यान काय झाले? वाचा
ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी नितेश राणेंच्या वतीने म्हणाले की, ‘या संपूर्ण प्रकरणात नितेश राणेंना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे. तसेच पेपर कटरने जीवे मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो का?’ असा सवाल करण्यात आला. तसेच पुढे रोहतगी म्हणाले की, ‘याप्रकरणात ज्यांची नावे आहेत, त्यांच्याशी मोबाईलद्वारे कोणताही त्यांचा संपर्क झाला नाही. विधानसभेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना म्याव म्याव केल्याच्या प्रकारामुळे त्या प्रकरणाचा राग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.’
दरम्यान सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला की, नितेश राणेंवरचे गुन्हे केवळ राजकीय नाहीत, तर इतरही गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. याप्रकरणात त्यांच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण झाली आहे का? षडयंत्र रचले गेले होते का? अशा सगळ्या बाजूने तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन नाकारावा असा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल देत नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळून लावला. निकाला दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ‘योग्य न्यायालयात त्यांनी दाद मागावी. १० दिवसांत जिल्हा न्यायालयाला शरण यावे. तोपर्यंत त्यांना अटक करण्यात येवू नये.’