“सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे आणि संपुर्ण दुष्काळी भागासाठी सर्वकष निर्णय घ्यावेत”, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. दरम्यान राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्याची वेळही शरद पवार यांनी पत्राद्वारे मागितली आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश भागात १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण स्थिती आहे. मी ३० एप्रिल, १२ व १३ मे या दिवशी सोलापूर, अहमदनगर व बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त गावांना, पाण्याअभावी सुकलेल्या फळबागांना व चारा छावण्यांना भेटी देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली.#drought pic.twitter.com/oL2cVXgGzh
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 15, 2019
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेचा रणसंग्राम संपताच सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर या दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर थेट जात आणि चारा छावण्यातील शेतकऱ्यांच्या, मालकांच्या अडचणी शिवाय धनगर समाजातील प्रतिनिधींनी शेळ्या मेंढ्याकरीता चारा छावणीच्या धर्तीवर स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली. त्यांच्या दृष्टीने तो दिलासा ठरेल असेही शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
ग्रामस्थांची कैफियत व समस्या पत्राद्वारे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांच्याकडे कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्याच्या दृष्टीने मांडल्या आहेत व @CMOMaharashtra, संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांसह तातडीने बैठक आयोजित करून दुष्काळग्रस्त प्रतिनिधींसह भेटीची अपेक्षा व्यक्त केली आहे. pic.twitter.com/Si200J8qPX
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 15, 2019
शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या जाणून घेतलेल्या समस्या, त्यांच्या अडचणी यावर उपाययोजना काय करायला हव्यात यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात प्रत्येक मुद्दे आणि समस्या व दुष्काळावर काय उपाययोजना कराव्यात याबाबतचे सविस्तर म्हणणे मांडले आहेत. या समस्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी दुष्काळी भागातील काही प्रतिनिधींसह मुख्यमंत्र्याची वेळही मागितली आहे.