महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना आणि जवाहरलाल नेहरु यांचा काँग्रेस हा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान होते आणि त्यामुळेच मी या पक्षात आलो आहे, असे विधान बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, काँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांने केले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे प्रचार सभेत ते बोलत होते.
#WATCH Shatrughan Sinha, Congress in Chhindwara, MP: Congress family from Mahatma Gandhi to Sardar Patel to Mohd Ali Jinnah to Jawaharlal Nehru…it's their party, they had the most important role in development & freedom of the country. This is the reason I've come here. (26.4) pic.twitter.com/HJg3EV8rNE
— ANI (@ANI) April 27, 2019
काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही
काँग्रेसने देशासाठी मोठे योगदान दिल्यानेच मी काँग्रेसमध्ये आलो असून यानंतर पुन्हा कुठेही जाणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपावर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. व्यक्तीपेक्षाही पक्ष मोठा असतो आणि पक्षापेक्षाही देश मोठा असतो. परंतु देशापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. मोदींनी जेव्हा नोटाबंदीनंतर जीएसटी लागू केला तेव्हा आंबट लिंबावर कारलं खायला दिल्यासारखे होते, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसच्या हातात हात दिला आहे. भाजपच्या ३९ वा स्थापना दिवशी शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या नेतृत्वावर गेल्या काही दिवसापासून नाराज असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सिन्हा हे बिहारच्या पटना साहिब मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात भाजपाने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. हे दोघेही कायस्थ समाजाचे आहेत. या मतदारसंघात कायस्थ समाजाची मोठी संख्या असल्याचे समोर आले आहे.