घरमहाराष्ट्र'आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले'

‘आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले’

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोल्हापूर आणि सांगली पूर परिस्थितीचा सामना करत आहेत. त्यांच्या बचाव आणि पुनर्वसनाचे कार्य सुरू असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोल्हापूर व सांगलीतील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून केंद्र शासनाकडूनही मदत घेण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे राज्य शासनाच्या संपर्कात असून केंद्राकडून लागेल ती मदत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत दोन लाख ५२ हजार ८१३ जणांना सुरक्षित स्थळी हलविले असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

इतर राज्यांतील आपत्ती व्यवस्थापन दलही कार्यरत

कोल्हापूर व सांगलीमध्ये जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानासह महसूल, जलसंपदा, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकारी अहोरात्र पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून राबत आहेत. स्थानिक प्रशासनाबरोबरच ओडिसा, पंजाब व गुजरात राज्यातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे २२ तसेच नौदलाच्या २६, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये २ व कोल्हापूरात ९ पथके, सैन्यदलाचे ८ पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये दोन तर कोल्हापूर मध्ये एक अशी तीन पथके कार्यरत आहेत. तसेच कोल्हापूरमध्ये ७६ तर सांगलीमध्ये ९० बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आता अलमट्टी धरणातून ४ लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग


कोल्हापुरातील पाणी पातळी कालच्या पेक्षा कमी

पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासनाने केंद्र शासनाशी तत्काळ संपर्क साधल्यामुळे सैन्य दलाची व तटरक्षक दलाची पथके कार्यरत झाली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाबरोबर मदती संदर्भात संपर्कात आहे.
सध्या कर्नाटकातील आलमट्टी धरणातून आज दुपारपर्यंत ४ लाख ५० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून त्यामुळे कोल्हापुरातील पाणी पातळी कालच्या पेक्षा कमी झाली आहे. तसेच सांगलीतील पाणी पातळी स्थिर आहे. पाऊस कमी झाल्यानंतर या ठिकाणची पाणीपातळी आणखी कमी होण्यास मदत होईल.

१५४ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला

पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाने १५४ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यातून ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रति कुटूंब १० हजार तर शहरी भागातील प्रति कुटूंब १५ हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. ही मदत तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २३९ गावे व सांगली जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ९० गावे अशी १२ तालुक्यातील ३२९ गावे पूरामुळे बाधित झाली आहेत. पूरामुळे बाधित गावातील दोन लाख ५२ हजार जणांना बचाव पथकानी सुरक्षितस्थळी हलविले असून विविध २७० ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पूरस्थिती : आर. आर. पाटलांसारखी धमक फडणवीस का दाखवत नाहीत?


सांगलीत बचाव कार्य सुरू

सांगली जिल्ह्यातील सांगलवाडी व हरिपूर येथे एनडीआरएफ व एसडीआरएफची टीम बचाव कार्य सुरू करत आहेत. सांगलवाडीत २० ते २२ बोटीद्वारे बचावकार्य सुरू आहे. तसेच एअरलिफ्टिंगने नागरिकांना हलविण्यात येत आहे. तर हरिपूरमध्येही बोटीतून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मिरज, पलूस व वाळवा तालुक्यातही प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या राहण्याची, जेवणाची व औषधोपचाराची सोय केली आहे. याबरोबरच जनावरांच्या बचावासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कवलापूर येथे तीन हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू आहे.

पूरपरिस्थिती सामान्य करण्याचे काम वेगाने सुरू

पूरग्रस्त भागात अन्न पाकिटे, पिण्याचे पाणी तसेच औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरामधील पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. तसेच ज्या ठिकाणी अद्याप पाणी आहे तेथील नागरिकांना सुखरुप काढण्यात येत असून वृद्ध व आजारी नागरिकांना प्राधान्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. तसेच जे नागरिक उंचावर सुरक्षित ठिकाणी आहेत, त्यांना फळे, अन्न पाकिटे व पाणी पुरवठा करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोल्हापुरातील पूरपरिस्थिती सामान्य करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शिरोळ तालुक्यात मदतीसाठी पथके पाठविण्यात आली आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी राज्य व केंद्र शासन सर्व मार्गाने प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -