छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज रायगडावर जमा आले होते. परंतु या सोहळ्याला गालबोट लागले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा आटोपून परतताना महादरवाजा जवळ झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक शिवभक्तांची कोंडी झाली. या चेंगराचेंगरीत एका शिवभक्ताचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
अशोक उंबरे (वय – २३, रा. उस्मानाबाद) या शिवभक्ताचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. दरम्यान, गर्दीमुळे खाली उतरायला संधी नसल्याने पायऱ्यांवर हजारोंच्या संख्येने शिवभक्त अवघडलेल्या अवस्थेत ठाण मांडून बसले. दरबारातून शिवरायांची पालखी निघाली तेव्हा जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी रायगड दणाणून गेला होता. परंतु राज्याभिषेक सोहळा संपल्यानंतर माघारी परतण्यासाठी शिवभक्तांनी एकच गर्दी केली. यात एका शिवभक्ताचा चेंगरून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.