महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष न्यायप्रविष्ठ असून, मागील अनेक महिन्यांपासून यावर सुनावणी होण्यासाठी न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. अशातच आज होणारीही सुनावणी लांबणीवर गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्रतेच्या संदर्भात आज न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, पाच न्यायमूर्तींपैकी आज न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे उपलब्ध नाहीत. त्यामुळं आजची सुनावणी लांबणीवर गेली आहे. (supreme court postpone hearing on Maharashtra political crisis vvp96)
मागील अनेक महिन्यांपासून ही सुनावणी लांबणीवर जात आहे. त्यामुळे आता राज्यातील सत्तासंघर्षावर पुढची सुनावणी कधी होणार आणि त्या 16 अपात्र आमदारांचे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं होतं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना तीन आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर आज होणारी सुनावणी राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारच्या दृष्टीनं निर्णायक ठरण्याची शक्यता होती. मात्र, ही सुनावणी आता लांबणीवर गेली आहे. त्यामुळे याबाबत कधी निर्णय लागणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान याआधी एक नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, दोन्ही पक्षकार संयुक्तपणे लिखितपणे आपली बाजू न्यायालयात मांडतील. त्याशिवाय, त्याला जोड असणारे कागदपत्रे देखील जोडतील. जेणेकरून एक समान मुद्दे तयार होतील.
येत्या चार आठवड्यात ही लिखित बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. घटनापीठासमोर उपस्थित होणारे अथवा निर्णय घेण्यासाठी जे मुद्दे मांडण्यात येतील ते घटनापीठासमोर संयुक्तपणे सादर करण्यात येतील.
हेही वाचा – सीमा प्रश्नासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाई ३ डिसेंबरला बेळगावला जाणार