घरमहाराष्ट्रटॉमेटोला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने केला लाल चिखल

टॉमेटोला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने केला लाल चिखल

Subscribe

बुलढाणा : गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. पावसामुळे कापसाने देखील निराश केली आहे. सोयाबीन, तूर आणि कापूस या तीन नगदी पिकांनी शेतकऱ्याची निराशा केल्यानंतर आता फळभाजीही डोळ्यादेखत भुईसपाट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मागील काही दिवसात अनेक शेतांमध्ये मेंढ्या किंवा ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. असे असताना आता टॉमेटोलाही बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत आहे.

टॉमेटो खरेदी करताना सामान्य ग्राहकाला बाजारपेठेत घासाघीस करण्याची वेळ आली आहे. कारण बाजारपेठेत एक किलो टॉमेटोला अवघा एक रुपया इतका दर मिळत आहे. सोयाबीन, तूर, कापूस, फुलकोबी पाठोपाठ आता टोमॅटो देखील त्याचा रंग दाखवत आहे. टोमॅटोला अवघ्या एक रुपया भाव मिळत असल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी रस्त्यावरच टोमॅटो फेकून निषेध केला आहे. भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

- Advertisement -

यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, गहू, मोहरीसारख्या पिकांची लागवड केली. तसेच पावसामुळे विहीर तलावांनादेखील मुबलक पाणी असल्याने भाजीपाला पिकांचीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्नही चांगले झाले. मात्र, उत्पन्न चांगले झाले असतानाही पिकांना भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. आठवडी बाजारामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने टॉमेटो विक्रीसाठी आणला मात्र, कॅरेटला दहा रुपये क्रेटप्रमाणे भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी टॉमेटो फेकून देणे पसंत केले. कारण शेतकऱ्यांकडून एक रुपया किलोने खरेदी करण्यात आलेले टोमॅटो ग्राहकांना वीस रुपये किलो दराने विकले जात आहेत. यावर्षी अर्धा एकरावर टॉमेटोची लागवड केल्यानंतर चांगले उत्पन्न तर मिळाले मात्र, पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडी बाजारामध्ये टॉमेटोला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे आता टॉमेटो तोडणी करायला देखील शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी टॉमेटो फेकून देणे पसंत केले.

पुन्हा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा इशारा
शेतकऱ्यांवर पीक फेकून देण्याची वेळ आली असतानाच पुढील तीन दिवस म्हणजेच १४, १५ आणि १६ मार्च रोजीसुद्धा पुन्हा एकदा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे तोडणी केलेल्या मालाला सुरक्षित करणे तसेच न तोडलेल्या मालाची तोडणी करून ते सुरक्षित करण्याचे दुहेरी संकट पुन्हा शेतकऱ्यांवर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -