मुंबई – गोवा महामार्गावर चिपळूण जवळ परशुराम घाटात काल दरड कोसळली होती. यामुळे परशुराम घाटातील वाहतूक ठप्प आहे. संध्याकाळी 4 वाजता बंद झालेली वाहतूक अद्यापही सुरु झालेली नाही. त्यामुळे घाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
दक्षिण कोकण आणि गोवा भागात सकाळपासून पाऊस आणि तुरळक ठिकाणी 200 मिमि पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. रत्नागिरीतील अनेक नद्या धोक्याच्या पताळीवरून वाहत आहेत. कोकणात पुढील काही तासा मध्यम ते तीव्र सरींची शक्यता आहे. याबाबत माहिती हवामान विभागाने दिली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे.
नद्यांनी इशार पातळी ओलांडली –
कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा थोडी कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीच्या वरून वाहात आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, तसेच जीवितहानी होऊ न देणे यासाठी मुख्यमंत्र्यांनी खबरदारीचे निर्देश दिले आहेत
रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा –
रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. महाड शहरातील नद्यांच्या पाणी पात्रात मोठी वाढ झाली आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दस्तुरी नाका ते रायगड रोड मार्गावर पाणी आहे. पाऊस सुरुच असल्याने पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.