घरमहाराष्ट्रTrimbakeshwar Temple : भोसले, दवे, राणेंची एसआयटी चौकशी करा, पटोलेंची मागणी

Trimbakeshwar Temple : भोसले, दवे, राणेंची एसआयटी चौकशी करा, पटोलेंची मागणी

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भाजपा (BJP) आणि त्यांच्याशी संलग्न संघटना करत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) धूप दाखवण्याच्या प्रकरणाला भाजपाशी संबंधित लोकांनी जाणीवपूर्वक वादाचा रंग देऊन वातावरण बिघडवण्याचे काम केले, असा थेट आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गुरुवारी केला.

गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात विशिष्ट गटाकडून जबरदस्तीने घुसण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. या निर्णयावर पटोले यांनी गरुवारी भाजपावर जोरदार टीका केली. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा कोणताही प्रकार झालेला नाही. धूप दाखवण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आली असल्याचे गावकरी आणि पोलीस सांगत आहेत. मात्र भाजपाशी संलग्न संघटना जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून गावातील वातावरण शांत असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे. गावकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन भाजपाचा दंगल घडवण्याचा डाव हाणून पाडला, असे सांगून नाना पटोले यांनी, अनाचार्य भोसले, हिंदू महासभेचा आनंद दवे, आमदार नितेश राणे यांच्यासह ज्यांनी त्र्यंबकेश्वरचे वातावरण बिघडवण्यास खतपाणी घातले, चिथावणी दिली त्यांचीच चौकशी फडणवीस यांनी नेमलेल्या एसआयटीने करावी, अशी मागणी केली.

राज्यातील सामाजिक एकोप्याला गालबोट लावत छत्रपती संभाजीनगर, अकोला, शेवगाव, अहमदनगर आणि आता त्र्यंबकेश्वरमध्ये जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे काम केले गेले. त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू महासभा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, भाजपा आध्यात्मिक आघाडी, युवा मोर्चा या भाजपाच्या बगलबच्यांनी मंदिराच्या पायऱ्यावर गोमूत्र शिंपडून महाआरती केली. हिंदूशिवाय इतर धर्मांच्या लोकांनी मंदिरात प्रवेश करू नये, असे फलक झळकवले. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजपा लोकांमध्ये धार्मिक वाद घडवून आणत आहे, असा आरोप पटोले यांनी केला. मात्र राज्यातील जनता सुज्ञ असून भाजपच्या अशा षडयंत्राला बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

…म्हणून मोठा अनर्थ टळला
नाशिकमधील काळाराम मंदिर प्रवेशासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसह सत्याग्रह केला होता. आज त्याच नाशिक जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण बिघडवले जात आहे. मागील काही दिवसातील घटना पाहता भाजपा जाणीवपूर्वक अशा घटनांना खतपाणी घालण्याचे काम करू शकते. मात्र, त्र्यंबकेश्वरच्या लोकांनी तसेच नाशिकमधील स्थानिक प्रसार माध्यमांनी घेतलेली भूमिका यामुळे मोठा अनर्थ टळला, असेही पटोले म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -