राज्यातील तीन शहरांमध्ये मुस्लीम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मालेगावात मुंबई-आग्रा महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. तसेच जाळपोळ देखील करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये मुस्लीम संघटनेच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. अमरावतीमध्ये २० ते २२ दुकानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. तसेच एका दुचाकीचीही तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांकडून सुद्धा अश्रू धुरांच्या नळकांड्यांचा आणि बळाचा वापर करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये आंदोलकांकडून दगडफेड करण्यात आली आहे. त्यामुळे दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. नांदेड, अमरावती आणि मालेगावमध्ये या मोर्चाला गालबोट लागलं असून राज्यातील तीन शहरांमध्ये त्याचे पडसाद उमटताना पहायला मिळत आहे.
त्रिपुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, या मोर्चाला परवानगी नव्हती. तरीसुद्धा हा मोर्चा काढण्यात आला आणि अचानकपणे हे मोर्चे हिंसक बनले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली, त्यानंतर पोलिसांनी सुद्धा सौम्य लाठीमार करण्यास सुरूवात केली.
गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली प्रतिक्रिया…
या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आयटी आणि लॉ ऑर्डर यांच्यासोबत दुपारपासून माझं दोन वेळा बोलणं झालं. की ज्याला सक्त सूचना दिल्या गेलेल्या आहेत. काही समाज कंठक लोक असतात, त्या लोकांना जाणीवपूर्वक असे काही प्रकार करण्याची सवय असते. आम्ही यातील कोणत्याही दोषीला सोडणार नाही. जेव्हा दगडफेकीचा प्रकार घडला. तेव्हा आमची संपूर्ण पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून ज्या लोकांनी समाजाला किंवा भडकवण्याचं काम केलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल. अशी प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
ही परिस्थिती चिंताजनक…
त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, असं ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत.
राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 12, 2021
हेही वाचा:मालेगावात बंदला हिंसक वळण; पोलिसांचा जमावावर लाठीचार्ज