त्रिपुरामधील कथित घटनांचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्यातील तीन शहरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले आणि त्यातून दगफेक करण्यात आली. यामुळे राज्यात सध्या अशांतता आणि अस्थिरता पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. ‘महाराष्ट्र सरकारने हे मोर्चे थांबवले नाही तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील’, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. नितेश राणे यांनी याबाबत ट्विट केले आहे.
हे मोर्चे महाराष्ट्र सरकारनी थांबवले नाहीत..
तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील..
हे राज्य सरकार नी लक्षात ठेवावे !!!— nitesh rane (@NiteshNRane) November 12, 2021
मोर्चाच्या माध्यमातून ताकद दाखवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात सुरु आहे. हे प्रयत्न महाराष्ट्र सरकार थांबवू शकत नसेल किंवा तो थांबवण्याचा प्रयत्न करू शकत नसेल तर मग हिंदूंच्या समर्थनार्थ ही प्रतिमोर्चे महाराष्ट्रात लवकरच निघतील मग ते मोर्चे सरकारने थांबवू दाखवावे असे आव्हान नितेश राणे यांनी यावेळी राज्य सरकारला केले आहे. हिंदूना घाबरवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हिंदूच्या समर्थनार्थ राज्यभरात मोर्चे निघतील आणि राज्य सरकारने ते मोर्चे बघत रहावे असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत.
राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 12, 2021
दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात उमटलेल्या प्रतिक्रियांचा निषेध व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मार्चे आणि त्यातून झालेली दगडफेक, तोडफोड हिंसा हा प्रकार अतिशय चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने या प्रकाराची त्वरित दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहिल याची खबरदारी घ्यावी असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – Tripura Violence: देशात अस्थिरता निर्माण करुन भाजपला २०२४च्या निवडणूकीत उतरायचे आहे – संजय राऊत