मुंबई – महाविकास आघाडी फुटलेली नाही, आम्ही अजूनही एकत्रच आहोत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज विधिमंडळात बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी फुटलेली नसून आम्ही अजूनही एकत्रच आहोत. पुढे काय निर्णय घ्यायचा हे येणाऱ्या काळात सांगेन असे म्हटले आहे.
तोपर्यंत देशात लोकशाही राहील –
यावेळी मला न्याय देवतेवरती विश्वास आहे. दोन गोष्टी सांगू इच्छीतो न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते कारण कायद्या समोर सगळे सारखे असतात. जनता उघड्या डोळ्याने सगळे बघत असते. त्याचवेळी न्यायदेवता आणि जनता हे दोन लोकशाहीचे आधारस्तंभ जोपर्यंत आपल्या देशात मजबूत आहेत. तोपर्यंत देशात लोकशाही राहील बेबंदशाही येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. आता मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते.