Varun Sardesai | मुंबई – आमदार योगेश सागर यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी वरुण सरदेसाई यांची चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. मात्र, वरुण सरदेसाई यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत मानहानीचा खटला दाखल करण्याचा सूचक इशाराच दिला आहे.
विधिमंडळ अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी आमदार योगेश सागर यांनी नाव घेऊन माझ्यावर आरोप केले आहेत. या आरोपांत काडीमात्र तथ्य नाही. यावर प्रतिक्रिया देण्याइतपतही याचं महत्त्वं नाही. पण काल दिवसभर विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रात बातम्या छापून आल्याने आज मी खुलासा करत आहेत, असं वरुण सरदेसाई म्हणाले.
हेही वाचा – वरुण सरदेसाईंकडून युवकांची फसवणूक, योगेश सागरांच्या आरोपांवर फडणवीसांकडून चौकशीचे आश्वासन
हिंदुस्तान स्काऊट अॅण्ड गाईड ही संस्था जगातील १०० हून अधिक देशांत मदत आणि पुनर्वसनसंदर्भात प्रशिक्षण देते. जुलै २०२१ चिपळूणला अतिवृष्टी झाली होती. यावेळी अतिवृष्टीग्रस्तांना मदत आणि पुनर्वसनासाठी राज्यभरातील अनेक संस्थांनी पुढाकार घेतला होता. तेव्हा हिंदुस्तान स्काऊट अॅण्ड गाईड ही केंद्र शासन मान्यता प्राप्त असलेल्या संस्थेचे अध्यक्ष माझ्याकडे आले आणि त्यांनी मला या संस्थेचे अध्यक्षपद घेण्याची विनंती केली. महाराष्ट्रातील कोणत्याही भागात अतिवृष्टी किंवा इतर कोणतीही आपत्ती ओढावल्यास बाधितांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी या संस्थेकडून प्रशिक्षण दिलं जाईल. म्हणून ऑक्टोबर २०२१ मध्ये हिंदुस्तान स्काऊट अॅण्ड गाईड, महाराष्ट्राचं मी अध्यक्षपद स्वीकारलं, असं वरुण सरदेसाई म्हणाले.
ही संस्था केंद्र शासन मान्यता प्राप्त असून मी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राज्यानेही या संस्थेला मान्यता दिली. १८ नोव्हेंबर २०२१ महाराष्ट्राने मान्यता दिली, अशीही माहिती सरदेसाई यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून सव्वावर्षाचाच कालावधी झाला आहे. या काळात नागपुरात एकच कॅम्प आम्ही घेतला. हा कॅम्प अत्यंत यशस्वी झाला, असं सांगून या कॅम्पचे फोटोही वरुण सरदेसाई यांनी दाखवले. या कॅम्पदरम्यान, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मदत आणि पुनर्वसन प्रशिक्षण दिलं गेलं. मात्र, माझ्यावर विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले असल्याचा आरोप करण्यात आला. पण सभागृहात योगेश सागर यांनी जी नावे वाचून दाखवली त्यातील एकालाही मी ओळखत नाही. त्यांना मी कधीही संपर्क केलेला नाही. त्यांच्याकडूनही कधी संपर्क झाला नाही. त्यांनी मला कधी पत्र लिहिलं नाही, असंही सरदेसाई यांनी पुढे स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात स्काऊट अॅण्ड गाईडचं काम विविध संस्था करतात. या संस्था शासनमान्यता नाहीत. यापैकी कोणत्याही संस्थांनी गरीब बेरोजगार तरुणांची फसवणूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण या कोणत्याही विद्यार्थ्याचा संस्थेशी आणि माझ्याशी संबंध नाही, असं सरदेसाई म्हणाले.
देशात फक्त दोन स्काऊट अॅण्ड गाईड संस्थांना मान्यता आहे. भारत स्काऊट अॅण्ड गाईड आणि हिंदुस्तान स्काऊट अॅण्ड गाईड या दोनच संस्था मान्यताप्राप्त आहेत. या संस्थामधून नोकरभरती होत नाही. त्यामुळे पैसे घेऊन नोकरी देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे माझ्यावर लावलेल्या आरोपांना अर्थच नाही. एखाद्या व्यक्तीने शेतकऱ्याच्या मुलाचे पैसे उकळले असतील तर त्यावर शंभर टक्के कारवाई केली पाहिजे. पण राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडायचं हे चुकीचं आहे, असं वरूण सरदेसाई म्हणाले.