कॅन्सर सारखा आजार कुणाला होऊच नये, जर कुणाला दुर्दैवाने हा आजार झाला तर त्यावर अत्याधुनिक उपचार करणे देखील तितकेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. रिलायन्सने अकोल्या सारख्या शहरात अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उघडल्या बद्दल त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. अकोल्यातील रिलायन्स हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्याचरोबरच विदर्भात मोठ्या प्रमाणात तोंडाचा कॅन्सर असल्याचा खुलासा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे. मोठ्या प्रमाणात विदर्भात मिळणाऱ्या तंबाखू जन्य पदार्थांमुळे हा आजार बळावत असल्याचे ते म्हणाले.
कॅन्सर आजारामुळे कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटते
कुटुंबात कुणाला कॅन्सर झाल्यास तो रुग्णच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच उध्दवस्त होते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कॅन्सर या जीवघेण्या आजारामुळे कुटुंबाची आर्थिक घडीही विस्कटून जाते. अशा परिस्थितीत कुटुंबाला मानसिकतेसह आर्थिक आधार देणे ही तितकेच गरजेचे असते. राज्य शासन हे महात्मा फुले जनआरोग्य अभियान आणि केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत या योजनेतून कॅन्सरवरील उपचारासाठी रुग्णाला सहाय्य देखील करते.
वाचा – कॅन्सर पीडितासाठी रेल्वे अधिकारी बनला देवदूत
विदर्भात मुख कर्करोगाचे प्रमाण अधिक
विदर्भात मुख कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळून येत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. या कर्करोगाच्या आजारापासून समाजाला मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. शासनाने गत कालावधीत मुख कर्करोग तपासणी मोहिमही राबविली आहे. त्यामुळे आता कॅन्सरवर उपचार करण्यासाठी आता परदेशात किंवा मेट्रो शहरामध्ये जाण्याची गरज नसून अकोल्यासारख्या शहरात देखील ही सुविधा रिलायन्सने उपलब्ध करुन दिली आहे.
रिलायन्सने अकोला शहरात कॅन्सरवर उपचार करणारे आधुनिक यंत्र सामुग्रीसह सुसज्ज रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात कॅन्सर पिडीत रुग्णांनी उपचार घ्यावेत. यानंतर पुढच्या टप्प्यात रिलायन्स सोलापूर व गोंदीया येथे कॅन्सर चिकित्सा रुग्णालय उभारणार आहे. त्यासाठी मिळत असलेल्या राज्य शासनाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. राम नारायन यांनी केले. कॅन्सर हॉस्पीटलमध्ये असलेल्या सुविधांबाबत त्यांनी माहिती दिली. – टिना अंबानी