नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडी चौकशी सुरू असल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईत काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला असून हँगिंग गार्डन ते राजभवनपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठिकठिकाणी बँरिकेट्स लावण्यात आली आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून भाजपविरोधी घोषणाबाजी केली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह असंख्य नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत. (Violent agitation by Congress in Mumbai; Morcha Raj Bhavan with Police escort)
राहुल गांधी यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला देखील उपस्थित आहेत.
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 16, 2022
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. या तीन दिवसांत तीस तास ईडीने त्यांची चौकशी केली. शुक्रवारी पुन्हा एकदा त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील काँग्रेस पक्ष या कारवाईविरोधात आक्रमक झाला आहे.
चौकशी कशी होते?
सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे सलग तीन दिवस राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले. तसेच, त्यांची विधाने एका पेपर लिहून घेतली जात असून त्या पेपरवर राहुल गांधी यांची स्वाक्षरीही घेतली जात आहे. स्वाक्षरीनंतर हे पेपर तपास अधिकाऱ्यांकडे दिले जात आहेत.
राहुल गांधीनी सातत्याने जनत्तेचे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे केंद्र सरकारच्या पाया खालची वाळू सरकून त्यांनी भेकड कारवाई केली. भाजपाच्या या हुकूमशाही विरोधात काँग्रेस पक्ष आज राजभवनाजवळ आंदोलन करणार आहे. यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने यावे ही नम्र विनंती !#IndiaWithRahulGandhi pic.twitter.com/nZNpZ0XoR5
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 16, 2022
दरम्यान, शुक्रवारी मुंबईच्या सर्व सहा जिल्ह्यांमध्ये मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाणार आहे. मुंबई काँग्रेसचे जिल्हास्तरावरील सर्व स्थानिक नेते, आजी-माजी आमदार व नगरसेवक, मुंबई काँग्रेसचे सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.