घरमहाराष्ट्रकोरोनात पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केले असते तर?

कोरोनात पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केले असते तर?

Subscribe

नववर्षानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व पोलीस कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांवरही निशाणा साधला. मी आपला कुटुंब प्रमुख आहे. त्यामुळे माझ्यावर आपली जबाबदारी आहे. मध्यंतरी पोलिसांवर बरेच आरोप झाले. मात्र, आज आरोप करणार्‍यांची तोंडे बंद झाली आहेत. पोलिसांवर कोणताही डाग लागू देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

रात्री बारा वाजता आपण सर्वजण एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत असतो. गेले वर्ष हे कसे गेले त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. गेल्या वर्षात आपल्याला ज्या वाईट गोष्टींचा अनुभव आला ते गेल्या वर्षात संपून, नवे येणारे वर्ष आशा, आकांशा आणि आनंद घेऊन येवो. नवे वर्ष उत्साहाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे येवो, असे आपण एकमेकांना शुभेच्छा देतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी गेले कित्येक वर्ष ‘मातोश्री’त आहे. काल मी ‘वर्षा’त होतो. सहज मनात आले, सगळे एकमेकांना शुभेच्छा देत आहोत. वृत्तपत्र, प्रसारमाध्यमातून बातमी येत होती की, सगळ्यांचे नववर्ष हे घरातच साजरे होणार आहे. आपण सगळ्यांनी घरात सेलिब्रेशन केले. पोलिसांच्या आयुष्यातही नववर्ष आले आहे. पोलिसांना सुद्धा उत्सव, सण असतात. कारण पोलीस ही सुद्धा माणसे आहेत, असे सांगत त्यांनी टीकाकारांची रेवडी उडवली.

- Advertisement -

मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय. तुम्ही दक्ष राहता, तुम्ही जबाबदारी घेता, म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कोरोना संकटात काही हजार पोलिसांना कोरोनाने गाठले. काहीजण या संकटाचा सामना करत असताना शहीद झाले. त्यांनाही आयुष्य आणि कुटुंब होते. पण तरीही ते लढले. कोरोना काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, स्वयंसेवक, महसूल यंत्रणा सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. जेव्हा संकट आले तेव्हा आपण लॉकडाऊन घोषित केला. सगळ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देत घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले. वर्क फ्रॉम होम पोलिसांनी केले असते तर काय झाले असते? पण तसे नाही झाले. तसे झाले नाही म्हणूनच आताची परिस्थिती नियंत्रणात आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले.

- Advertisement -

काहीजण माझ्यावर टीका करतात. तुम्ही अजूनही बंधने ठेवली आहेत. कारण अजूनही संकट गेलेले नाही. संकट अजूनही डोक्यावर आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये तर हाहा:कार निर्माण झाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -