घरठाणेभिवंडीत एका नवरीकडून नवरोबांच्या फसवणुकीच्या लग्नाची पाचवी गोष्ट

भिवंडीत एका नवरीकडून नवरोबांच्या फसवणुकीच्या लग्नाची पाचवी गोष्ट

Subscribe

गरिबीचे नाटक करून नवर्‍यांची लुबाडणूक केल्याचा आरोप, तीन महिलांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फसवणुकीच्या अनेक घटना आपल्या आजुबाजूला नेहमीच घडत असतात. मात्र, वेगवेगळ्या तरुणांशी गरीब आणि निराधार असल्याचे सांगून लग्न करून त्यांच्याकडून पैसे व दागिने घेऊन नवविवाहित वरांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. गरिबीच्या नावाने लग्न करून तरुणांना लुटल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी भामट्या तरुणीसह तिच्या आईला आणि त्यांची आणखी एक महिला साथीदार अशा तीन महिलांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

रिना देवरे (२३) असे आरोपी तरुणीचे नाव आहे. ती आपली आई मंगला देवरे आणि मावशी सुनीता संजय माहिरे यांच्या मदतीने फसवणूक करत होती. आई वडील नाहीत मी खूप गरीब आहे, अशी खोटी माहिती सांगून रिना हिचे तिचे नातेवाईक लग्न लावत होते. मात्र, लग्न झाल्यानंतर रिना आपल्या पतीला वेगवेगळी खोटी कारणे सांगून पळून जात होती. जाताना लग्नात नवरदेवाने दिलेले पैसे आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा तिचा फंडा होता. वेगवेगळ्या ठिकाणचा खोटा पत्ता त्या प्रत्येकवेळी नवनवीन नवर्‍यांना देत असल्याने तिचा पत्ता देखील कोणाला सापडत नव्हता.

- Advertisement -

३० मार्च रोजी भादवड येथील हरेश उत्तम पाटील याच्याशी तिचा चौथा विवाह झाला होता. या याआधी रिना हिने सुरत, मालेगाव, पुणे येथील तरुणांना लग्न करून फसवले होते. तर तिचा पाचवा विवाह धुळे येथील एका तरुणाशी ठरला होता. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी रिना लग्न करताना गरिबीचे कारण पुढे करून नवर्‍या मुलाच्या घरी जाऊन लग्न करत असे. ३० मार्च रोजी ती भादवड येथील हरेश याच्या घरी आली तिथे हरेश सोबत तिचा विवाह देखील झाला. सुरुवातीला तिने हरेशकडून ५ हजार रुपये घेतले. त्यानंतर लग्नाच्या खरेदीसाठी ४० हजार रुपये घेतले. त्यांनतर २९ मार्च रोजी हळदीच्या दिवशी आईला कोरोना झाला असे सांगून ५० हजार रुपये बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतले आपली होणारी पत्नी गरीब असल्याने मदतीच्या नावाने हरेशने रिना हिला ९५ हजार रुपये दिले आणि लग्नात तिला सोन्याचे दागिने देखील केले होते.

मात्र त्यांनतर रिना व तिच्या आईने तिचा पाचवा विवाह धुळे येथील एका तरुणासोबत जमविला होता. या तरुणाकडून रिनाने ६० हजार रुपये घेतले होते. त्याच्याशी विवाह करायचा असल्याने रिना हिने माहेरी जाण्याचा हट्ट धरला होता. त्यासाठी पतीला आईची तब्येत बरी नसल्याचे कारण सांगितले. मात्र, पतीने मी देखील सोबत येतो असे सांगितल्यानंतर रिनाने त्यास नकार दिला. तसेच विनाकारण भांडण करण्यास सुरुवात केली. अखेर पत्नीच्या वागण्याचा पती हरेश यांस संशय आल्याने त्याने मंगळवारी थेट शांतीनगर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. शांतीनगर पोलिसांनी रिना, तिची आई मंगला देवरे आणि मावशी सुनीता माहिरे यांना ताब्यात घेतले असता फसवणुकीचा सर्व प्रकार समोर आला.

- Advertisement -

या फसवणूक प्रकरणी या तीन महिलांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघींना देखील अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या महिलांनी आणखी किती जणांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का यादृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -