घरताज्या घडामोडी'त्या' वक्तव्यावर आशिष शेलारांची अखेर माफी!

‘त्या’ वक्तव्यावर आशिष शेलारांची अखेर माफी!

Subscribe

सीएए राज्यात लागू न करण्याविषयी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर आशिष शेलार यांनी वादग्रस्त पद्धतीने टीका केली होती. त्याबद्दल आता आशिष शेलार यांनी माफी मागितली आहे.

सीएए अर्थात नागरिकत्व (सुधारणा) कायदा लागू करण्यावरून शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपने टीका करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात बोलताना नालासोपाऱ्यात बोलताना भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, ‘आज मी टीव्हीवर बघितलं की शिवसेनेने सीएएविषयी आपली भूमिका बदलली आहे. सीएए महाराष्ट्रात लागू देणार नाही, तुझ्या बापाचं राज्य आहे का? हा केंद्राचा कायदा आहे. अॅडव्होकेट जनरलचं ओपिनियन घ्या. अभ्यास करता येत नसेल, तर माझ्यासारखे वकील खूप आहेत.’ दरम्यान, या वक्तव्यावरून मोठा गदारोळ उठल्यानंतर अखेर आशिष शेलार यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.

बापाचं राज्य आहे का?…

आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटच्या माध्यमातून टीका केली. ‘उद्धवच्या बापाचे राज्य आहे का? असे जाहीर निवेदन करणं आशिष शेलार यांना शोभत नाही. होय, मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाहीत’, असं आव्हाड यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

माफी मागायला अडचण नाही…

दरम्यान, या आरोपांनंतर आशिष शेलार यांनी सारवासारव करत भूमिका स्पष्ट केली. ‘माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाला असंवैधानिक वाटत असेल, त्रास झाला असेल, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला, माफी मागायला माझी काहीही अडचण नाही. पण माझा रोख हा शिवसेनेसाठी नव्हता. कारण उद्धव ठाकरेंनी त्यांची सीएएविषयीची भूमिकाच अजून जाहीर केलेली नाही. माझ्या टीकेचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दिशेने होता’, असं आशिष शेलार म्हणाले आहेत. आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. त्याशिवाय आशिष शेलार यांनी संविधानाच्या मुद्द्यावरून टीका करण्यासाठी ट्वीट देखील केलं.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -