राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून विरोधकांकडून सातत्याने सरकार पडण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे. त्यासोबतच, तीन पक्षांच्या या सरकारमध्ये असलेल्या मतभेदांवर वारंवार बोट ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘राज्यातलं सरकार टिकवायचं असेल, तर काँग्रेस नेतृत्वावर टीका करणं टाळा’, असा इशाराच महाविकासआघाडीतल्या इतर दोन पक्षांना उद्देशून दिला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील शरद पवारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले’, असं विधान थोरात यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये अजूनही नाराजी किंवा अंतर्गत धुसफूस आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयी आपली भूमिका मांडली होती. ‘राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये सातत्य दिसून येत नाही’, असं शरद पवार म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. तीच नाराजी आता बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली आहे. ‘राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले’, असं थोरात म्हणाले आहेत. ‘राहुल गांधी आमचे नेते असून पक्षानं त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे. त्यांनी आयुष्यात सहन केलेल्या आघातांमधून ते सावरत आहेत. शरद पवार ज्येष्ठ आहेत हे आम्ही मान्य करतो, पण राहुल गांधींना समजून घेण्यात ते कमी पडले. आगामी काळात राहुल गांधी समर्थपणे पक्षाचं नेतृत्व करतील’, असं थोरात यावेळी म्हणाले.