राज्यात काल विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. काही तासांनी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशातच काँग्रेसने ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रांच्या परिसरात जॅमर बसविण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. ईव्हीएम मशीन टँपरींग होऊ शकते अशी जनभावना असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
काय म्हटलंय पत्रात?
प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी व त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी. तसेच कोणत्याही मतदान यंत्राबाबात शंका निर्माण झाल्यास त्या मतदान यंत्रातील मतांची मोजणी सलग चारवेळा करण्यात यावी, आणि ५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी, अशा मागण्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या पत्राद्वारे केल्या आहेत.