गेल्या मंगळवारी (३० नोव्हेंबर २०२१) वरळी बीडीडी चाळीत सकाळच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत पुरी कुटुंबातील विद्या पुरी (२५) यांचा सोमवारी (६ डिसेंबर) मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वी पुरी कुटुंबातील चार महिन्यांच्या बालकाचा आणि त्यानंतर शनिवारी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या दुर्घटनेतील मृताची संख्या ३वर पोहोचली. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या दुर्घटनेमुळे अनाथ झालेल्या ५ वर्षांच्या मुलाची जबाबदारी शिवसेना घेणार असल्याचे सांगितले.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, देवकरो आणि ५ वर्षांचे बाळ वाचलेच पाहिजे, इतका आमचा प्रयत्न सुरू आहे. त्या बाळाचे पालक म्हणून मी आणि माझी शिवसेना संगोपन करू. आम्ही त्या बाळाला दत्तक घेऊ. जे काही उपचार बाळावर आता सुरू आहेत, त्याला ईश्वराने चांगला प्रतिसाद देण्याची ताकद देवो. ते बाळ वाचवले पाहिजे. आज बाळ तोंडावाटे अन्न घेतेय आणि ओळखतय.
पुढे किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, संवेदना बोंबाबोंब मारून दाखवता येत नाहीत. संवेदना या कामातून दिसल्या पाहिजेत. जो बाटला फुटला. त्याचा तपास सुरू आहे. त्या दिवशी सकाळी सकाळी लाईट लावता क्षणी स्फोट झाला. त्या क्षणी स्वताच्या जीवाची पर्वा न करता शिवसैनिक तिथे पोहोचले आणि त्यांनी रुग्णवाहिका करून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान पुरी कुटुंबीय राहत असलेल्या वरळी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर पुरी कुटुंबीयांवर गंभीर जखमी अवस्थेत उपचार करण्यात अक्षम्य हलगर्जीपणा करणाऱ्या त्या डॉक्टर, नर्स यांना केवळ निलंबित न करता त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा – OBC reservation : इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी सर्वजण चिंतेत, ५४ टक्के ओबीसींवर अन्याय होतोय