मुंबईत सोमवारपासून बंद असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत एक महत्त्वाची माहिमी समोर आली आहे. मुंबईचा पाणीपुरवठा (Mubai Water Supply) सुरळीत होण्यासाठी आणखी आठ तासांचा विलंब होणार आहे. पुर्वनियोजित वेळेनुसार, मुंबईतील पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरळीत होणे अपेक्षित होते. मात्र काही दुरुस्तीच्या कामांना विलंब झाल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यास उशीर होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. (It will take another 8 hours to restore water supply in Mumbai)
पाणीपुरवठा होण्यास विलंब होण्याबाबत महापालिकेकडून पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, सोमवारी (३० जानेवारी २०२३) सकाळी १०:०० वाजल्यापासून ते मंगळवार (३१ जानेवारी २०२३) सकाळी १०:०० वाजेपर्यंत भांडुप संकुल येथील जल शुद्धीकरण केंद्रास पर्यायी ४००० मिमी व्यासाची जल वाहिनी जोडणे २४०० व १२०० मिमी व्यासाच्या झडपा बसविणे, गळती दुरुस्ती करणे आणि इतर संलग्न कामे हाती घेण्यात आली होती.
जाहीर सूचना
बृहन्मुंबई महानगरपालिका जल अभियंता खात्याची मुंबईकरांना महत्वाची सूचना!#MyBMC #MyBMCUpdates pic.twitter.com/PbPnG2br0t
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 31, 2023
या सर्व कामांसाठी भांडुप संकुल येथील १,९१० दश लक्ष लीटर प्रति दिन क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र सुमारे ४२ वर्षानंतर प्रथमच २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, ही सर्व कामे पूर्ण करताना त्या दरम्यान बऱ्याच तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे उपरोक्त कामे पूर्ण करून १,९१० दश लक्ष लीटर प्रति दिन क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र, केंद्रापर्यंत येणाऱ्या व केंद्रापासून पुढे जाणाऱ्या सर्व जल वाहिन्या पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी ८ तासांचा अतिरिक्त कालावधी लागणार आहे.
पुर्वनियोजित वेळेनुसार, बाधित झालेल्या भागांचा पाणीपुरवठा मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता सुरळीत होणार होता. मात्र, दुरूस्तीच्या कामांना विलंब झाल्याने पाणीपुरवठा आज संध्याकाळी ०६:०० वाजल्यापासून पूर्वपदावर येणे अपेक्षित आहे.
हेही वाचा – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव कारची बसला धडक, चार ठार; महिन्याभरात दुसरा अपघात