घरCORONA UPDATE'माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली कोरोना वाढत असल्याची चिंता'

‘माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली कोरोना वाढत असल्याची चिंता’

Subscribe

कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची अन्य कारणे दाखवून त्यांचे पार्थिव परस्पर सोपवले जात असल्याने आणि परिणामी पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने कोरोना वाढण्याचा धोका अधिक वाढत आहे.

कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची अन्य कारणे दाखवून त्यांचे पार्थिव परस्पर सोपवले जात असल्याने आणि परिणामी पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने कोरोना वाढण्याचा धोका अधिक आहे. एकट्या नायर रूग्णालयातील अशी ४४ प्रकरणे आपल्याकडे आहेत, अशी तक्रार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केलेल्या तसेच मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृत्युची अन्य कारणे देऊन मृतदेह परस्पर सोपवल्याने मृत्यू संख्या कमी दिसून असली तरी त्यामुळे कोरोनाचा धोका प्रचंड वाढत आहे. या संदर्भातील एकट्या नायर हॉस्पिटलमधील ४४ प्रकरणे निदर्शनास आली आहेत. यातील दोन उदाहरणे देताना फडणवीस म्हणाले की, यातील पहिला रूग्ण ४० वर्षीय आहे. तो रुग्ण १२ एप्रिल २०२० रोजी दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी रुग्णालयात दाखल झाला. सायंकाळी साडेसात वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या रेकॉर्डवर मृत्यूचे कारण ‘लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट डिस्ट्रेस सिंड्रोम इन अ कोविड सस्पेक्ट’ असे लिहिले आहे. त्यांच्यावर झालेल्या उपचारांचे कागदपत्र पाहता त्यावर ‘शिफ्ट टू आयसोलेशन वॉर्ड अँड टेक थ्रोट स्वॅब’ असे लिहिले आहे. प्रत्यक्षात मात्र तो स्वाब घेण्यात आल्याचे दिसत नाही. पेशंट मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांचा मृतदेह तसाच परस्पर देण्यात आला आहे. याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे पत्रातून लक्ष वेधले.

- Advertisement -

दुसरे एक रुग्ण वय वर्ष ४९ यांना ४ एप्रिल २०२० रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८ एप्रिल २०२० रोजी चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये मृत्यूचे कारण हे ‘टाईप १ लोअर रिस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन इन नोन केस ऑफ डायबेटिस आणि २ कोविड सस्पेक्ट विथ अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’ असे लिहिले आहे. याही रुग्णाचे केस पेपर्स पाहता आयसोलेशनमध्ये ऍडमिट करून कोविड स्वॅब घेण्याबाबत डॉक्टरांनी लिहिले आहे. मात्र या संपूर्ण चार दिवसातही त्यांची टेस्ट झाल्याचे किंवा त्याचा रिझल्ट आल्याचे कुठेही दिसत नाही. मृत्यूनंतर याही रुग्णाचा मृतदेह अंत्यविधीसाठी सोपवण्यात आला. एकट्या नायर हॉस्पिटलमधील आतापर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार ४४ रुग्ण अशाच प्रकारे स्वॅब न घेता कोरोना संशयित म्हणून त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यात आल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

इतरही वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील काही रिपोर्ट आपल्याकडे प्राप्त झाले आहेत. एकूणच या सर्व प्रकारामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या नोंदी तर कमी होतच आहेत. परंतु त्यांना नॉन-कोवीड समजल्याने त्यांच्या घरची मंडळी किंवा जवळच्या नित्य संपर्कातील अतिजोखमीच्या लक्षणे नसलेल्या (हायरिस्क असिम्टोमॅटिक) व्यक्तींचे विलगीकरण आणि टेस्टिंगही होत नाही. त्यामुळे अजाणतेपणामुळे त्यांना संक्रमण झाले असल्यास ते मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका निर्माण होतो आहे. ही प्रथा तात्काळ बंद करावी. एखादा रुग्ण दाखल झाल्याबरोबर तपासणीचा नमुना घेण्यासाठीचा जो प्रोटोकॉल आहे, त्याचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. दुर्दैवाने मृत्यू झाल्यास टेस्टच्या निकालावर आधारित अतिजोखमीच्या व्यक्तीला चिन्हांकित करून त्यांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातील कारवाई तसेच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासंदर्भातील कोरोना नियमावलीचे पालन होईल, याची दक्षता घेण्याचे आदेश आपण द्यावे, अशी विनंतीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजारावर; तर ७२२ जण कोरोनामुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -