गेल्या तेरा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु आहे. आज या आंदोलनाचा चौदावा दिवस आहे, तरीही सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. सरकारने अजूनही मराठा समाजाच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. सरकारने जर उद्यापर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर उद्या मुंबईमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी दिला आहे. आज मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आझाद मैदानावर पत्रकार परिषद बोलवली होती. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा – मराठा समाजाला आरक्षण मिळणारच – मुख्यमंत्री
मराठा तरुणांना आंदोलकांकडून आवाहन
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील मराठा समाजाच्या तरुणांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, हे आंदोलन आपण शांतपणे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हिंसेने मार्ग सुटत नाही असे आंदोलक म्हणाले आहेत. मराठा समाजाच्या काही तरुणांनी आंदोलन करताना आत्महत्या केली आहे. या आंदोलकांच्या घरच्यांना आर्थिक १० लाखांची मदत व्हावी, अशी विनंती आंदोलकांनी सरकारला केली होती. ही मदत सात तारखेपर्यंत करावी, असे आंदोलकांनी सांगितले होते. परंतु, अद्यापही सरकारने मदत केलेली नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करणार असल्याचे आंदोलक म्हणाले.
हेही वाचा – मराठा आरक्षण: मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्य सचिवांकडे सुपूर्द
मुख्यमंत्री म्हणतात, आरक्षण मिळणारच
मराठा मूक मोर्च्यांचे रुपांतर हिंसक झाल्यावर सरकारने डिसेंबर महिन्यापर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे वचन दिले होते. परंतु, अर्धा डिसेंबर महिना निघून गेला तरीही आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे या विरोधात मराठा क्रांती मोर्चाने उपोषण सुरु केले आहे. आता तर त्यांनी पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असे सांगितले आहे. शिवाय, आता आंदोलन नाही तर एक डिसेंबरला जल्लोष करा, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
हेही वाचा – मराठा आरक्षण अहवालासाठी कोट्यवधींचा खर्च!