मुंबई -: मुंबई महापालिकेने दुकाने, हॉटेल्स आदी ठिकाणी मराठी भाषेत व ठळक अक्षरात नामफलक लिहिण्यासाठी दिलेली ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत संपली आहे. मुंबई महापालिका दुकाने व आस्थापना विभागाने अद्याप कारवाई सुरू केलेली नाही. आता दसरा संपल्यावर या कारवाईला मुहूर्त मिळणार आहे. तोपर्यंत पालिका व आस्थापना विभाग ‘अॅक्शन प्लॅन ‘ तयार करीत आहे.
मुंबईत सध्या दसरा मेळाव्यानिमित्ताने व विविध राजकीय घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी पालिका मुख्यालयात धावती भेट दिली. त्यामुळे पालिका आयुक्त इकबाल चहल व चारही अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदी पालकमंत्री यांच्या आढावा बैठकीत व्यस्त राहिले. तसेच, केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक जाहीर केली आहे. त्यासाठी निवडणूक विभागही कामाला लागला आहे.
तर दुसरीकडे दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आणि बीकेसी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईसह राज्याचे लक्ष हे या दोन्ही मेळाव्याकडे लागले आहे. मात्र मुंबईत मराठी भाषेत व ठळक अक्षरात दुकाने, हॉटेल्स आदी ठिकाणी नामफलक लिहिण्यासाठी पालिकेने व्यापारी बांधवांना दिलेली मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. यापूर्वी दोन वेळा पालिकेने मुदतवाढ दिली होती. तरीही दुकानदार, हॉटेल्स मालकांनी वेळकाढूपणा केला. आता पुन्हा एकदा व्यापारी बांधवांना पालिकेकडून मुदतवाढ पाहिजे आहे. मात्र पालिकेने कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही.
त्यामुळे आता पालिकेच्या दुकाने व आस्थापना या विभागाला दुकाने, हॉटेल्स आदी ठिकाणी मराठी भाषेतून व ठळक अक्षरात नामफलक न लावणाऱ्या दुकानदार, हॉटेल्स चालक यांवर कारवाई करणे भाग पडणार आहे. ५ ऑक्टोबर रोजी दसरा सण आहे. हा दसरा सण एकदा पार पडला की, मुंबई महापालिका दुकाने व आस्थपना विभाग मराठी भाषेत व मोठ्या अक्षरात नामफलक न लिहिणाऱ्या दुकानदार व हॉटेल्स चालकांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे.
मुंबईत मराठी पाट्या नसणाऱ्या दुकाने, आस्थापनांवर दस-यानंतर म्हणजे गुरुवारपासून कारवाईचा बडगा उगारला जाईल. मात्र त्यासाठी मंगळवारी कारवाईबाबत ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात येत आहे. आतापर्यन्त पाच लाख दुकानदार, हॉटेल्सवाले यांपैकी दोन लाख दुकानदार, हॉटेल्सवाले यांनी मराठी भाषेत व ठळक मोठ्या अक्षरात नामफलक लिहिले आहेत. उर्वरित तीन लाख दुकानदार, हॉटेल्सवाले यांनी मराठी भाषेत व ठळक मोठ्या अक्षरात नामफलक न लिहिल्याने ते पालिकेच्या रडारवर आले आहेत. त्यांच्यावर येत्या गुरुवारपासून कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.