करोनाशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे अवाहन केले आहे. भारतासह राज्यात करोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ६३ वर पोहचली आहे. या आवाहानाला प्रतिसाद म्हणून मुंबईतील अनेक सेवा उद्या बंद रहाणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील मेट्रो सेवाही बंद राहणार आहे. मेट्रो प्रशासनाने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. तर मध्य रेल्वेनं रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. एकूण क्षमतेच्या ६० टक्के लोकल गाड्याच मुंबईत चालवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मेट्रो प्रशासनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मुंबईकरांनी घरातच राहावे व पंतप्रधानांनी जाहीर केलेला जनता कर्फ्यू यशस्वी व्हावा, या उद्देशानं मुंबई मेट्रोची घाटकोपर-वर्सोवा सेवा रविवारी संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. ‘कोविड १९’ लढण्याचा हा एक प्रयत्न आहे,’ असं मेट्रोच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. #HaveANiceDay असं हॅशटॅगही ट्विटसोबत करण्यात आलं आहे.
In continuation of our fight against #Covid19 and in support of Hon’ble PM’s appeal of #JanataCurfew, #MumbaiMetroOne suspends operations on 22/03/2020 (Sunday) for the entire day, to encourage people to stay at home and make “Janta Curfew” an unprecedented success. #HaveANiceDay
— Mumbai Metro (@MumMetro) March 21, 2020
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या सुमारे २४०० लांब पल्ल्याच्या गाड्या एक दिवसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणार्या लोकलच्याही काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पॅसेंजर ट्रेन 21 मार्चला रात्री 11 वाजल्यापासून 22 मार्च पूर्ण दिवस बंद राहणार आहेत. मेल, एक्सप्रेस आणि इंटरसिटी 22 मार्चला पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहतील. मात्र, रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील लोकल रेल्वेबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार विभागीय रेल्वे खात्याला दिले आहेत. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या दिवशी किती लोकल रेल्वे सोडायच्या यावर अंतिम निर्णय विभागीय रेल्वे विभागच घेणार आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे,असे वारंवार आवाहन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतुकीवरही निर्बंध आणण्याची मागणी होत आहे. त्यावर सरकारने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, रविवारी (20 मार्च) जनता कर्फ्यूच्या दिवशी किमान वाहतूक बंद ठेवण्यावर सरकारचा भर असल्याचे या निर्णयातून दिसत आहे.
हे ही वाचा – रविवारी २४०० लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द