गिरणी कामगारांच्या घरासाठीच्या असणाऱ्या लॉटरीत जिंकणाऱ्या विजेत्यांसाठी म्हाडा घरे उपलब्ध करुन देणार आहे. म्हाडा या घरांसाठी बोरीवलीमधील म्हाडाच्या जागेवर किंवा कांजूरमार्गमधील खार येथील जागा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. म्हाडाच्या या लॉटरीत आतापर्यंत १ लाख ७५ हजार गिरणी कामगारांनी अर्ज भरले आहेत.
‘तर सर्व कामगारांना घरे मिळायला १७५ वर्ष लागतील’
गिरणी कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी म्हाडा अध्यक्षांनी नुकतीच गिरणी कामगारांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कामगार नेत्यांनी आपल्या समस्या मांडल्या. दरम्यान, या बैठकीत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सांगितले की, आजपर्यंत म्हाडाच्या लॉटरीत १ लाख ७५ हजार गिरणी कामगारांनी अर्ज भरले आहेत. परंतु, म्हाडा दरवर्षी १ हजारच घरे देते. म्हाडा जर एका वर्षाला १ हजार घर देत असेल तर सर्व कामगारांना घरे मिळण्यासाठी १७५ वर्षे लागतील. त्यामुळे म्हाडाने नुसती घरांची लॉटरी न काढता, घरांसाठी जागाही उपलब्ध करुण द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा – अखेर म्हाडाच्या लॉटरीला दिवाळीचा मुहूर्त मिळाला
बैठकीनंतर सर्वेक्षणाचे आदेश
गिरणी कामगारांसोबत झालेल्या बैठकीनंतर म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना कांजूरमार्ग येथील खार जमीन आणि बोरिवली येथील प्राधिकरणाच्या जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. म्हाडाची मंजूरी मिळाल्यानंतर काही दिवसांतच गिरणी कामगारांसाठी गृह प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. दरम्यान, गिरणी कामगारांसोबत झालेल्या बैठकीत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळाचे सभापती विनोद घोसळकर देखील उपस्थित होते.
हेही वाचा – म्हाडाच्या कार्यकारी अभियंताला लाच घेताना अटक