एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरगजेबाच्या दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते इम्तियाज जलील, वारीस पठाण यांची उपस्थिती होती. यावरुन वाद निर्माण झाला असून भाजप आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये मी आव्हान करतो…पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा…याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही,” असे नितेश राणे म्हणाले. तर याआधी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ओवेसीला माहित आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण राज्यामध्ये नामर्दांचे सरकार आहे. याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
राज्यात हिंदूंना आणि शिवप्रेमींना नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न होता. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे लचके तोडले, आपल्या आई-वडिलांनाही सोडले नाही, अत्याचार केले त्याच्या कबरीसमोर तुमच्या छातीवर उभे राहून नतमस्तक होतो आणि महाराष्ट्रातून दोन पायावर निघून जातो हा संदेश द्यायचा होता का? हा संदेश मिळाल्यानंतर ठाकरे सरकार ज्यांना हनुमान चालीसा चालत नाही, जय श्रीराम चालत नाही…लगेच देशद्रोहाचे गुन्हे टाकतात त्यांनी २४ तास उलटून गेल्यावर ही या प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केलेले नाही?, अशी टीका नितेश राणे यांनी राज्य सरकारवर केली.
उद्धव ठाकरेंना जमत नसेल तर आम्ही आमदार, खासदार, शिवसेना, भाजपा नंतर आहोत. आधी आम्ही मराठा, शिवप्रेमी आहोत. जर संभाजीराजे, शिवरायांचा कोणी अपमान करत असेल तर फक्त १० मिनिटांसाठी अकबरुद्दीनला आमच्या हवाली करा. त्याला तिथेच रांगेत झोपवले नाही तर महाराजांसमोर नतमस्तक होणार नाही, असे नितेश राणे म्हणाले.
हे बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांना पटलेले नाही. ज्याचे रक्त भगवे आहे. ज्याच्या नसांमध्ये महाराज आहेत त्यांना झोप लागली नसणार. इतर वेळी पोलिसांच्या माध्यमातून हिंमत दाखवता ना…खरे मर्द असाल तर ओवेसीला त्याची जागा दाखवा. देशातील शिवप्रेमी चिडलेला आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली तर आम्ही जबाबदार नाही. जर कोणी आम्हाला चिडवत असेल तर आम्हीदेखील सहन करणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.