मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता २८ ऑक्टोबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या १०० टक्के लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास पुन्हा जलद होणार आहे. मुंबई लोकलने दररोज ३० लाखांच्या घरात प्रवासी प्रवास करतात. यात मध्य रेल्वेवर २१ ते २२ लाख तर पश्चिम रेल्वेवर १८ ते १९ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र आत्ताच्या घडीला मध्य रेल्वेवर फक्त १७०२ तर पश्चिम रेल्वेवर १३०४ लोकल फेऱ्या चालवल्या जातात. मात्र २८ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेवर १७७४ आणि पश्चिम रेल्वेवर १३६७ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने अत्यावश्यक सेवांमध्ये मुंबई लोकल ट्रेनचा समावेश केल्याने उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्यात आल्या. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच केवळ लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र १५ ऑगस्टपासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लसवंतांना फक्त मासिक पास काढून लोकल प्रवास खुला करण्यात आला. लसवंतांना लोकल प्रवास खुला केल्यापासून दिवसेंदिवस लोकल मधील गर्दी वाढू लागली. वाढत्या गर्दीमुळे अनेक लोकल फेऱ्या कमी पडत होत्या. सध्या ९५.७० टक्के लोकल फेऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून धावत आहेत.
त्यामुळे प्रवाशांकडून वारंवार रद्द केलेल्या लोकल सेवा सुरु करा अशी मागणी केली जात होती. परिणामी, मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने गुरुवारपासून १०० टक्के लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता लोकलच्या गर्दीपासून काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.