घरमुंबईयुती तुटली तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच

युती तुटली तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच

Subscribe

मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ आणि भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले. महापालिकेत बहुमताच्या ११४ नगरसेवक संख्येचा आकडा कुणालाच पार करता आलेला नाही. मात्र, भाजपला फोडाफोडीचे राजकारण करत हा मॅजिक आकडा पार करता येणार होता. परंतु, स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवणार्‍या शिवसेना भाजपने निवडून आल्यानंतर युती धर्म पाळला आणि भाजपने पहारेकर्‍याची भूमिका बजावत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेना मुबंई महापालिकेत सत्तेवर आहे. परंतु, आता राज्यातील सत्तेची समिकरणे बिघडल्यास भाजप दिलेला पाठिंबा काढून शिवसेनेला कोंडीत पकडू शकते. मात्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे समीकरण तयार झाल्यास महापालिकेतही काँग्रेसचे २९ आणि राष्ट्रवादीचे ८ मिळून ३७ नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेला मिळू शकतो, असे सध्या गणित मांडले जात आहे.

आज भाजपचे एकूण ८३ नगरसेवक असून शिवसेनेचे अपक्षांसह एकूण ९४ नगरसेवक आहेत. त्यामुळे महापालिकेत भाजपपेक्षा शिवसेनेचे ११ नगरसेवक अधिक असले तरी भाजपने पाठिंबा काढला तर शिवसेना अल्पमतात येईल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ९४ नगरसेवक असलेल्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यास ११४ हा जादूई आकडा सहज शिवसेना पार करू शकेल. त्यामुळे भाजपने पाठिंबा काढला तरी मुंबई महापालिकेतील सत्ता आम्ही जाऊ देणार नाही असा विश्वास शिवसेनेच्या एका नेत्याने आपलं महानगरला दिला.मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जर महापौर, उपमहापौरांसह समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिल्यास शिवसेनेला याचा फटका बसणार नाही. मात्र,शिवसेनेची डोकेदुखी भाजप नक्की वाढवू शकतो. सध्या तरी शिवसेना हा महापालिकेत मोठा पक्ष असल्याने तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या स्थितीत नसल्याने सध्या तरी शिवसेना सेफ झोनमध्येच आहे.

- Advertisement -

खर्च वाचवणार्‍या फडणवीसांमुळे भाजप खड्डयात
राज्यातील आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीशी जुळवून घेतले होते. त्यामुळे राज्यात मला धोका देवून नका, मी तुम्हाला महापालिकेत धोका देणार नाही,अशीच कमिटमेंट मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंकडे केले होते. त्यामुळे महापालिकेत सत्ता स्थापनेच्याद्ष्टीकोनातून नगरसेवकांची संख्या वाढवण्याची सुवर्णसंधी धावून आलेली असताना, मुख्यमंत्र्यांनी ती संधी मातोश्रीच्या दिशेने फिरवली. मनसेच्या एकूण सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांनी महापालिका गटनेते दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. परंतु हे सर्व नगरसेवक पूर्वी भाजपच्या संपर्कात होते. भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी यासर्वांना पक्षात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी शिवसेनेकडे यासर्व नगरसेवकांना पाठवून शिवसेनेची महापालिकेतील खुर्ची मजबूत केली. परंतु आज हे सहा नगरसेवक भाजपकडे आले असते तर तर आज भाजपची संख्या ८९ झाली असती. आणि या सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश झाला नसता तर त्यांची संख्या आज शिवसेनेची संख्या ८८ झाली असती. त्यामुळे महापालिकेतील मोठा पक्ष आता भाजप झाला असता आणि महापालिकेच्या सत्तेसह राज्यातील सत्ता वाचवण्यासाठी या आयुधाचा वापर करता आला असता. परंतु, मातोश्रीशी जवळीक साधून उध्दव ठाकरेंशी मैत्रीपूर्ण वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नात फडणवीस यांनी स्वत:सह भाजपलाही खड्डयात लोटण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -