टोमॅटोला – कांदयाला भाव नाही, दुधाला अनुदान नाही, शेतकऱ्यांनी मग करावं काय? निवडणुका जवळ आल्यावर महत्त्वाच्या मुद्दयांना बगल दिली जाते. तुम्हाला जमत नाही मग घोषणा करता कशाला? असा संतप्त सवाल सरकारला राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षातील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर देखील अजित पवार यांनी यावेळी जोरदार टीका केली.
फक्त पोकळ घोषणाच!
‘सरकार निव्वळ पोकळ घोषणा करत आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ६ ते ७ महिने पेन्शन दिली जात नाही. मात्र जाहिरातींवर सरकार करोडो रुपये खर्च करत आहे. सरकारच्या अशा अनेक चुकीच्या धोरणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार परिवर्तनाची मोहीम हाती घेतली’, असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
आघाडीसाठी लवचिक भूमिका
यावेळी अजित पवार यांना पत्रकारांनी काही प्रश्न केले. त्या प्रश्नांना आपल्या शैलीत त्यांनी उत्तरे दिली. शिवाय आघाडीबाबत बोलताना अजित पवार यांनी ‘आघाडी होताना आमची मागे-पुढे सरकण्याची भूमिका राहणार असून मित्रपक्षांशी तशी चर्चा करून नंतर मार्ग काढणार’, असल्याचे देखील सूतोवाच त्यांनी दिले.
तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात का? – ट्राफिकला कंटाळून अजित पवारांनी पकडली ‘डोंबिवली फास्ट’!
सातवा वेतन आयोग की एप्रिल फूल?
सरकार शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार आहे की नाही? कि फक्त एप्रिल फूल करणार आहे? असा टोला लगावतानाच वेतन आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होईल, असंही ते यावेळी म्हणाले.