घरमुंबईनेरूळ रेल्वे स्थानकाचे मनपाकडून पाणी बंद

नेरूळ रेल्वे स्थानकाचे मनपाकडून पाणी बंद

Subscribe

हार्बर रेल्वे मार्गावरील जंक्शन समजल्या जाणार्‍या नेरूळ रेल्वे स्थानकाचे नवी मुंबई महापालिकेकडून पाणीच बंद करण्यात आल्याने ऐन उन्हाच्या तडाक्यात व्यापार्‍यांसह प्रवासी नागरिकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपासून या स्थानकाचा पाणीपुरवठा बंद करण्यात असून नेरूळ स्थानक असुविधांच्या विळख्यात सापडले आहे. विशेष म्हणजे हे देयक सिडकोने थकवले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पाण्याअभावी रेल्वेस्थानक संकुलाची सफाई झाली नसल्याने प्रवाशांना नाक मुठीत धरून चालण्याची वेळ आहे. रविवारपासून या संकुलात पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे 184 व्यावसायिक आणि रेल्वेस्थानक संकुल पाण्याअभावी तहानलेले दिसत आहेत. एकीकडे उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे अनेकजण रेल्वे स्थानकाचा दुपारच्या सुमारास आश्रय घेतात. या ठिकाणी थांबायला व खानपान साठी व्यवस्था असल्याने अनेकजण दुपारचा वेळ स्थानकामध्येच घालवतात. त्यामुळे बंद पाण्याचा अनेकांना फटका बसला आहे. नुकतीच नेरूळ खारकोपर रेल्वे सेवा नेरूळ रेल्वे स्थानकावरून सुरु झाल्याने या ठिकाणी प्रवाशी संख्येत वाढ झाली आहे. 16 लाख 63 हजार रुपयांच्या थकबाकीसाठी ही जलजोडणी बंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

रेल्वेफलाटावर या संकुलातील पाण्याच्या टाकीमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र जलजोडणी बंद केल्याने आता प्रवाशी आणि संकुलातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. रेल्वे स्थानक परिसरात खाद्यपदार्थाचे दुकाने त्यासह हॉटेल मोठ्या प्रमाणात असल्याने दुकानदारांना याचा फटका बसला आहे. रेल्वेस्थानक संकुलात व्यावसायिक संकुल आणि रेल्वेला एकत्रित पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी जलजोडणीधारक म्हणून सिडको असून सिडको या परिसरातील रेल्वे आणि जल उपभोक्त्यांकडून प्रत्येकी 400 रुपये वसूल करते. मात्र सिडकोने नियमित वसुली करून देखील महापालिकेला देयकाचा भरणा केला नाही. याबाबत सिडकोचे अभियंता राजेश जैस्वाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. देयक न दिल्याने पाणीपुरवठा खंडित केल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

महापालिका जल विभागाच्या अभियंत्यांनी जलजोडणी पुन्हा सुरू करण्यास नकार दिला असून त्यांनी सिडकोशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. या स्थानकात मोठया प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रेते तसेच हॉटेल धारक असल्याने त्यांच्याकडे येणार्‍या ग्राहकांना पाणी मिळत नसल्याने त्यांच्याही नाराजीला सामोरे जावे लागत आहे.    विजय घाटे, अध्यक्ष, नेरूळ रेल्वे स्थानक संकुल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -