आगरी कोळी बांधवांना एकत्रित करून त्यांच्या कलागुणांना वाव देत समाजाच्या संस्कृतीचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने यंदा कल्याणात प्रथमच भव्य स्वरूपातील आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. येत्या ३० नोव्हेंबरपासून २ डिसेंबरपर्यंत असा तीन दिवस चालणाऱ्या उपक्रमात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी, महाराष्ट्र कोळी महासंघ अध्यक्ष अनंत तरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचा समारोप होईल. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मनसेचे नेते राजू पाटील देखील १ डिसेंबरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती समाज उत्कर्ष मंडळाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ भोईर आणि साईनाथ तारे यांनी दिली.
कार्यक्रमात खाद्य पदार्थांची चंगळ
या महोत्सवात सांस्कृतिक- पारंपरिक नृत्य, नाट्य या कार्यक्रमांबरोबरच आगरी-कोळी समाजातील चविष्ट आणि चमचमीत मटण, म्हावरा (मासे) आणि तांदुळाची भाकरी अशा खाद्यपदार्थांची मेजवानीही चाखायला मिळणार आहे. त्यामूळे अधिकाधिक संख्येने लोकांनी या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
विखुरलेल्या आगरी कोळी बांधवांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी समाज उत्कर्ष मंडळाची स्थापना करण्यात आली असून हा महोत्सवदेखील त्याचाच एक भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच आम्ही सर्व राजकीय पक्ष, राजकीय मतभेद बाजूला सारून केवळ समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र आलो आहोत असे साईनाथ तारे यांनी सांगितले. तर आगामी निवडणुकांबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय झाला नसल्याचेही यावेळी विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले.