मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कोर्टात प्रलंबित असतानाच या पदावरुन गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसचे आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच आता पुन्हा राज्यात सत्तेत आमच्या सोबत असलेल्या कॉंग्रेसचे हात पालिकेत मात्र कमळाच्या चिखलात बरबटले आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे उपनेते व पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या काँग्रेस पक्षावर केली आहे.
विरोधी पक्ष काँग्रेस हा शिवसेनेवर नाहक खोटे आणि दिशाभूल करणारे आरोप करीत असून भाजपच्या दावणीला गेला आहे, त्याचप्रमाणे, काँग्रेसने भाजप सोबत की आणखीन कोणासोबत जायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र काँग्रेसने चिखलात अडकलेल्या कमळाबरोबर हात मिळवणी केली असल्याचा आणि विरोधी पक्षनेते हे सध्या संभ्रमित झाल्याचा आरोप यशवंत जाधव यांनी केला आहे.
पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कोरोनावरील १६०० कोटी रुपयांचा प्रस्ताव आणि ताज हॉटेलला रस्ते, पदपथ वापरापोटी पालिकेला देय असलेली ९ कोटी रुपयांची रक्कम माफ करण्याबाबतचा प्रस्ताव विरोधकांना न जुमानता शिवसेनेने मंजूर केला. तेव्हापासून पालिकेत एका बाजूला शिवसेना एकटी तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी आणि भाजप हे एकत्रित आले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पालिकेत शिवसेना व काँग्रेस यांच्यात शाब्दिक चकमकी घडत आहेत तर अनेकदा आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहेत.
पालिका स्थायी समिती अखत्यारीत असलेल्या चिटणीस खात्याच्या उप चिटणीस यांनी काँग्रेस नगरसेविका व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या भगिनी कमरजहाँ सिद्दीकी यांनी, १५ दिवसांच्या सुट्टीबाबत सादर केलेला अर्ज चिटणीस विभागाने पटलावर न घेतल्याने आणि कमरजहाँ यांनी सलग काही दिवस सुट्टी घेतल्याने त्यांना एक माहितीपर नोटीस पाठवली होती. त्यामध्ये, तुम्ही सलग तीन महिने रजेवर राहिल्यास आणि त्याबाबतची माहिती पालिका सभागृहाला न दिल्यास तुमचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते, असे कळविण्यात आले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, स्थायी समिती अध्यक्ष व पालिका चिटणीस हे काँग्रेस नगरसेविकेचे पद घालविण्यासाठी कारस्थान करीत असल्याचा गंभीर आरोप केला होता.
हेही वाचा – मराठा संघटनांच्या विरोधानंतर अखेर पोलीस भरतीचा जीआर रद्द!