मुंबई हायकोर्टाने रिपब्लिक टीव्हीवर ताशेरे ओढले आहेत. सुशांत सिंह मृत्यू प्रकरमी रिपब्लिक टीव्हीच्या भूमिकेबद्दल हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. तपास सुरु असताना कोणाला अटक केली जावी अशी विचारणा प्रेक्षकांना करण्यासंबंधी तसेच शोध पत्रकारितेच्या नावे एखाद्या व्यक्तीच्या हक्कांचे उल्लंघन करण्यासंबंधी कोर्टाकडून रिपब्लिक टीव्हीला फटकारण्यात आले आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांनी चॅनेलकडून सुरु करण्यात आलेली हॅशटॅग मोहीम तसेच प्रसारित करण्यात आलेल्या काही बातम्यांचा संदर्भ यावेळी दिला आहे.
मुंबई हायकोर्टात सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मीडियाला दूर ठेवावे तसेच काही वाहिन्या मीडिया ट्रायल चालवत असून त्यांना रोखले जावे, अशा मागण्या करणाऱ्या जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर ही सुनावणी सुरु होती. यावेळी, आत्महत्या आहे की हत्या यासंबंधी तपास सुरु असताना चॅनेल हा हत्या असल्याचे सागंत आहे. ही शोध पत्रकारिता आहे का?, असा सवाल हायकोर्टाने केला. दरम्यान, रिपब्लिक टीव्हीने आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, सुशांत प्रकरणी आम्ही दाखवलेल्या बातम्या, रिपोर्ट यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत झाली. लोकांचे मत मांडण्याचा तसेच सरकारवर टीका करण्याचा अधिकार पत्रकारितेत आहे. न्यूज चॅनेलवर काय दाखवले जात आहे याचे कौतुक प्रत्येकजण करणार नाही. जर काहीजणांना त्या बातमीमुळे अस्वस्थ वाटत असेल तर हा लोकशाहीचा सार आहे.
हेही वाचा –
राज्य सरकारने CBI ला परवानगी नाकरली हे योग्यच; संजय राऊत यांची प्रतिक्रिया