कर्जामध्ये बुडालेल्या भूषण स्टील कंपनीचे अधिग्रहण टाटा स्टील कंपनी करणार आहे. टाटा स्टील कंपनीने जुन्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भूषण स्टील कंपनीत सुमारे पाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना टाटा स्टीलमध्ये कायम ठेवले जाणार आहे. त्यामुळे भूषण स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याविषयी बोलताना टाटा स्टील कंपनीचे व्यवस्थापन संचालक टी. वी. नरेंद्रन यांनी सांगितले की, भूषण स्टील कंपनीची सध्याची उत्पादन क्षमता ३ ते ३.५ मॅट्रीक टन इतकी आहे. भविष्यात ती वाढवून ४ ते ४.५ मॅट्रीक टन करण्याची योजना टाटा कंपनीची आहे. भूषण आणि टाटाच्या अधिग्रहण प्रक्रियेला नॅशनल कंपनी लॉ ऑफ ट्रायब्यूनलने औपचारिक मान्यता दिली आहे. या अधिग्रहणाविषयी बोलताना नरेंद्रन म्हणाले की, संपूर्ण अधिग्रहन ३५ हजार कोटींमध्ये झाले आहे. त्यामध्ये १८ हजार कोटी लगेच लावणार असून बाकीची रक्कम कर्जाने फेडली जाणार आहे.
नरेंद्रन यांनी पुढे सांगितले की, कंपनीचे उत्पादन ५ मॅट्रीक टन पर्यंत वाढवण्यासाठी आणखी गुंतवणूकीची गरज आहे. कंपनीची उत्पादन क्षमता पाच पासून आठ टनापर्यंत वाढवणे सहज सोपे आहे. गुंतवणूकीबाबतीत बोलताना नरेंद्रन यांनी सांगितले की, भूषण स्टील कंपनीत कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. मात्र भूषण स्टील कंपनीच्या ओडिशा स्थित युनिटमधील कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी या अधिग्रहणाला विरोध केला आहे. येथे अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. आपला रोजगार धोक्यात आसल्याची भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी टाटा कंपनीला त्यांनी विरोध दर्शवला आहे.