घरमुंबईपोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावणार

पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावणार

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

पोलीसांनी निःस्वार्थी, निःस्पृहपणे काम करुन त्यांच्याकडे येणार्‍या सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. गुन्ह्यामध्ये वेगवान तपास करुन आश्वासक कामगिरी केली पाहिजे. राज्य पोलीस दलाला आवश्यक सायबर लॅब, फॉरेन्सिक लॅब, आधुनिक तपास सामग्री दिली जाईल; पोलिसांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावले जातील. विभागाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत दिली.पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या अर्धवार्षिक परिषदेमध्ये मुख्यमंत्री ठाकरे मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस गृहनिर्माण, पोलीस कल्याण आदींचे महासंचालक, पोलीस महासंचालक कार्यालयातील विभागांचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, राज्यातील शहरांचे पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यावेळी उपस्थित होते.

पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये गुन्हेगारांपेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे असले पाहिजे. गुन्ह्यांची उकल करण्यासह संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा तसेच त्याच्या तंत्रांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे, असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना दिला.

- Advertisement -

शारिरीक तंदुरुस्तीसाठी योजना: अजित पवार

वॉरंट बजावण्यासाठी जाताना तसेच गुन्हेगारांना ताब्यात घेऊन येताना पोलिसांना एसटीच्या साध्या बसचा प्रवास लागू आहे. मात्र, वेगवान हालचालींची आवश्यकता लक्षात घेता ‘शिवनेरी’, आरामगाड्यांचा प्रवास अनुज्ञेय करण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही पवार यावेळी म्हणाले. पोलिसांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी वसतिगृहे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येतील. पोलिसांच्या शारिरीक तंदुरुस्तीसाठी योजना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.तर पोलिसातील माणसाच्या मागे राज्यशासन खंबीरपणे उभे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलिसांसाठी मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे लक्ष देण्यात येईल. पोलीस गृहप्रकल्पांसाठी राज्यशासन आवश्यक ती तरतूद करेल. मात्र, केंद्र शासनाकडूनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जावा. पोलिसांच्या गृहप्रकल्पांची कामे दर्जेदार व्हावीत. ती वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्री अनिल देशमुख

जगभरात ड्रोन हल्ल्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येते. हे एक नवीन आव्हान समोर आहे. याचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करुन कार्यान्वित करण्याची गरज आहे. पोलीस खात्यामध्ये ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा वापर कसा करता येईल याचाही विचार व्हावा. नवी मुंबई मध्ये महापे येथे ‘महाराष्ट्र सायबर’च्या मुख्यालयाच्या कामाला गती द्यावी, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -