एक्सप्रेस गाड्यांतील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जात असतात. रेल्वे प्रशासनाने याची योग्य ती दखल घेत यावर योग्य तो उपाय करून प्रवाशांना चांगली खाण्याची सुविधा पुरवावी हा त्यामागील हेतू असतो.परंतु,अशा तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. राजधानी एक्स्प्रेस,अगस्त क्रांती एक्स्प्रेस,तेज एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस गाड्यात मिळणार्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेविषयी आयआरसीटीसीला येणार्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. तसेच मागील दोन वर्षांत रेल्वे गाड्यांमध्ये मिळणार्या खाद्यपदार्थांविषयी एकूण ३ हजार ५४६ तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाचे खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठीचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसत आहे.खाद्य पदार्थ चांगले नाहीत, पदार्थ तयार केले जाताना पुरेशी स्वच्छता बाळगली जात नाही, अशा अनेक तक्रारी आयआरसीटीसीकडे येत आहेत. विशेष म्हणजे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल २०१७ मध्ये ३२३ तर २०१८ सप्टेंबर महिन्यापर्यंत ३२९ तक्रारी आल्या आहेत.
ठेकेदारांकडून 1 कोटींचा दंड वसूल
या तक्रारींनंतर आयआरसीटीसीने एक्स्प्रेस गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ पुरविणार्या ठेकेदारांवर कारवाई केली आहे. ठेकादारांकडून २०१७ मध्ये 55 लाख 64 हजार रुपये तर २०१८ मध्ये 54 लाख 97 हजार 500 रुपये असा 1 कोटी 10 लाख 61 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत समोर आली आहे.
रेल्वेतील खाद्यपदार्थ व अन्नाच्या गुणवत्तेसंबंधित प्रवाशांनी केलेल्या तक्रारी लक्षात घेऊन अन्नाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
-पिनाकीन मोरावाला, आयआरसीटीसी, मुख्य जनसंपर्क अधिकारी
खाद्यपदार्थां गुणवत्ता तक्रारी
वर्ष तक्रारी दंड
2017 1258 55, 64,000
2018 2288 54, 97, 500
एकूण ३,५४६ १,१०,६१, ५००