मुंबईत कोरोना कोविडच्या चाचण्या वाढवण्याची मागणी होत आहे, तरी प्रत्यक्षात आयुक्तांनी ज्या ठराविक दहा विभाग कार्यालयांना दैनंदिन एक हजार चाचण्यांचे टार्गेट दिले, त्यांच्याकडूनच ते पूर्ण केले नाही. जास्तीत जास्त चाचण्या करताना विभाग कार्यालयांकडून १०० ते ३५० चाचण्या केल्या जात आहेत. परिणामी चाचण्यांची संख्या कमी होऊन बाधित रुग्णांची संख्याही कमी दिसत आहे.
मुंबईतील कोरोना बाधित रुगणांच्या आकडा शून्यावर आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी शक्य तेवढ्या चाचण्या वाढवण्याचे निर्देश मागील महिन्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच ज्या भागांमध्ये रुग्ण संख्या व मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, अशा निवडक विभाग कार्यलयांना दैनंदिन १ हजार चाचण्या करण्याचे टार्गेट दिले. परंतु या विभागाच्या वतीने अवघे १०० ते १५० चाचण्या केल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे..
दरदिवशी ५० हजार चाचण्या करा
कोरोनाची रुग्ण संख्या सध्या दुसऱ्या टप्यात आहे. सध्या दरदिवशी १८०० ते २००० रुग्ण आढळत आहेत. निवासी इमारती, गृहसंकुले आणि झोपडपट्टी आदी भागांमध्ये मोठया प्रमाणात स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे. दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ ७ ते ८ हजार चाचण्या केल्या जात आहेत.त्यापैकी २५ टक्के रुग्ण कोरोना बाधित आढळून येत आहेत.मात्र अँटिजेन चाचण्यांच्या विश्वससार्हतेवर प्रशचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरटी- पीसीआर चाचण्या आवश्यक असून ही संख्या दैनंदिन ५० हजार एवढी करण्यात यावी. – प्रभाकर शिंदे, भाजप, महापालिका गटनेते
महापालिकेच्या जी- उत्तर, जी-दक्षिण, एल,, एन, एस, टी, आर-मध्य, आर-दक्षिण, आर-उत्तर, एच – पूर्व, एच- पश्चिम आदी विभागांकडून आयुक्तांच्या सर्वाधिक चाचण्या होण्याच्या अपेक्षा आहेत. काही विभागाच्यावतीने १०० चाचण्यांमध्ये ४० ते ४५ रुग्ण आढळतात तर काही विभागाच्या वतीने ३०० चाचण्या करून तिथे ५० ते ६० बाधित रुग्ण आढळून येतात. त्यामुळे कमी चाचणी होणाऱ्या विभागात जर चाचण्यांचे प्रमाण दरदिवशी एक हजार पेक्षा अधिक केल्यास बाधित रुग्णांची संख्याही वाढली जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे.