अरुणाचल प्रदेशात सीमारेषेवर असणाऱ्या गावामधील पाच तरुणांचे चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीकडून अपहरण करण्यात आले होते. त्यांचा शोध सुरु होता. अखेर त्यांचा पत्ता लागला असून बेपत्ता झालेले तरुण चीनमध्येच सापडले असल्याची माहिती केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांनी ट्विटद्वारे दिली आहे. चिनी ‘पीएलए’ या वृत्तास दुजोरा दिला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
चिनी ‘पीएलए’ (पीपल्स लिबरेशन आर्मी) ने भारतीय सेनेकडून हॉटलाइनवर पाठवण्यात आलेल्या संदेशाला उत्तर दिले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेले तरुण त्यांच्या भागात आढळले असून आता या तरुणांना भारताकडे सोपवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे, असे ट्विट किरेन रिजीजू यांनी केले आहे.
China’s PLA has responded to the hotline message sent by Indian Army. They have confirmed that the missing youths from Arunachal Pradesh have been found by their side. Further modalities to handover the persons to our authority is being worked out.
— Kiren Rijiju (@KirenRijiju) September 8, 2020
अरुणाचल प्रदेशचे काँग्रेस आमदार निनॉन्ग एरिंग यांनी काही दिवसांपूर्वी एक दावा केला होती की, ‘चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागातून पाच भारतीयांचे कथितरित्या अपहरण केले आहे. एरिंग यांनी पीएमओला टॅग करत आपल्या ट्विटमध्ये हा दावा केला होता की, अरुणाचल प्रदेशच्या सुबनसिरी जिल्ह्यातील पाच जणांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यांनी भारत सरकारकडे तात्काळ कारवाईची मागणी देखील केली होती’.
त्यानंतर केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांनी देखील त्या पाच तरुणांबाबत चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, भारतीय सेनेने रविवारी चिनी सैन्याच्या पीएलएला संदेश पाठवला होता. त्याच्या एकदिवस अगोदरच चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा, त्यांनी या संबंधी त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही, असे म्हटले होते.
हेही वाचा – भारतीय जवानांनी केलेले ‘हे’ कृत्य पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान