पनवेल : रस्त्यावरील अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असून यास वाहनांचा अतिवेग प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन हद्दीत दहा पोलीस ठाण्यांतर्गत ४९ अपघातांत ४९ ठार झाले असून ९१ किरकोळ अपघात झाले आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन हददित दहा पोलीस स्टेशनचा समावेश होतो. पनवेल, पनवेल तालुका, खांदेश्वर , कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजा, उरण, न्हावाशेवा, मोरा या दहा पोलीस स्टेशनच्या हद्दीन एक जानेवारी ते १३ मे पर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
जानेवारी ते एप्रिल दरम्यान परिमंडळ दोन हद्दीत ९१ किरकोळ अपघात झाले आहेत. यात काही प्रमाणात प्रवासी जखमी तर काही वाहनांचे नुकसान झाले आहे. चार महिन्यात पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ फेटल अपघात झाले असून त्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक अपघातांची ठिकाणे
टी पॉईंट, पनवेल, कर्नाळा अभयारण्य, उरण रोड, मुंबई – पुणे द्रूतगती मार्ग, कळंबोली सर्कल, सायन – पनवेल महामार्ग, गव्हाण फाटा आणि नेरे – सुकापूर रोड ही आहेत. अपघातांमागे अति वेग हेच मुख्य कारण असून बहुतांशी अपघात हे अतिवेगामुळे होत असल्याचे अपघातानंतर उघड झालेल्या माहितीनंतर स्पष्ट झाले आहे. अतिवेगामुळे वाहनाचे नियंत्रण सुटते आणि ताब्यातील वाहन इतर वाहनांना जाऊन धडकते. यात प्रवासी किंवा चालकाचा मृत्यू होतो. त्यामुळे अतिवेग टाळणे हाच यावरील उपाय आहे.
प्रवाशांनी रस्त्याचे नियम जे लिहिलेले असतात त्याचे पालन करणे आवश्यक आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. रस्त्यावर जेवढ्या वेगाने वाहन चालवण्यास सांगितले आहे तेवढ्याच वेगाने वाहन चालवावे, अति वेगाने वाहन चालवू नये. अचानक लेन कटिंग करू नये. वाहन रस्त्यामध्ये नादुरुस्त झाले असेल तर तो रस्त्याच्या कडेला घ्यावा आणि इंडिकेटर देणे आणि लाल रंगाचे चिन्ह गाडी पासून काही अंतरावर लावावे.
– प्रमोद पवार,
पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, पनवेल शहर