नवी मुंबई शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस बळ कमी आहे. त्यामुळे या आधुनिक शहरातील पोलीस बळ आणि पोलीस ठाणे वाढवण्यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने पाठवला आहे. त्यावर शासकीय पातळीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सोमवारी दिवसभर नवी मुंबईच्या दौर्यावर होते. दुपारी १२ वाजता त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सर्व वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नवी मुंबई शहराची लोकसंख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आगामी काळात खासगी बांधकाम व्यावसायिकांसह सिडकोचेही मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प शहरात येणार आहेत. त्यामुळे लोकसंख्येत मोठी भर पडणार आहे. या लोकसंख्येसाठी सध्या असलेले पोलीस बळ हे कमी आहे. याचा विचार करून पोलीस बळ आणि पोलीस ठाण्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने पोलीस ठाणे वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्यावर आणि अन्य प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आजच्या दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही वळसे पाटील यांनी यावेळी दिली.
राज्यातील सर्वच जेलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले आहे. मध्यंतरी मी पुण्यात गेल्यावर येरवडा कारागृहालाही भेट दिली होती. त्याचप्रमाणे आज नवी मुंबईत आल्यानंतर तळोजा कारागृहाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात क्षमतेच्या तीनपट कैदी ठेवण्यात आले आहेत. ही गर्दी कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार
राज्यातील पोलीस दलात जी मंजूर पदे आहेत ती थोड्याफार फरकाने भरण्यात आली आहेत. नवीन पदे जी निर्माण करायची आहेत त्याला थोडा विलंब लागणार आहे. कारण कोरोना महामारीमुळे राज्याच्या तिजोरीवर जोरदार ताण पडला आहे. पोलिसांची भरती प्रक्रिया मात्र सरकारने सुरू केली आहे. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया ही 2019 ची आहे. त्यानंतरच्या वर्षाची भरती प्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा –
IND vs ENG : विराट कोहलीच्या फलंदाजीवर गावस्करांची टीका, म्हणाले…