घरपालघरजव्हार, मोखाडा तालुक्यात गवत विक्रीतून साधला जातोय रोजगार

जव्हार, मोखाडा तालुक्यात गवत विक्रीतून साधला जातोय रोजगार

Subscribe

ओसाड जमिनीवर उगवणारे गवत कापून ते विक्री करत असल्याचे चित्र सध्या जव्हार, मोखाड्यातील तालुक्यांमध्ये पहावयास मिळत आहे. जव्हार, मोखाडा हे आदिवासी तालुके आणि रोजगारासाठी नागरिकांचे होणारे स्थलांतर हे जणू काही समीकरणच बनले आहे.

सर्वत्र ठिकाणी शेतीची कामे पूर्ण झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या हाताला कोठेच काम मिळेनासे झाले आहे. पण, पावसाळ्यात निर्माण झालेले गवत नागरिकांना रोजगार मिळून देत आहे. ग्रामीण भागात शेतजमिनीशिवाय बराचसा भाग ओसाड असतो. याच ओसाड जमिनीवर उगवणारे गवत कापून ते विक्री करत असल्याचे चित्र सध्या जव्हार, मोखाड्यातील तालुक्यांमध्ये पहावयास मिळत आहे. वर्षाचे बाराही महिने येथील नागरिकांना रोजगारासाठी वणवण भटकंती करावी लागते. जव्हार, मोखाडा हे आदिवासी तालुके आणि रोजगारासाठी नागरिकांचे होणारे स्थलांतर हे जणू काही समीकरणच बनले आहे. उन्हाळ्यात कधी वीटभट्टी तर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर तर पावसाळ्यात भात पिकासह नागली, वरई आदी पिकांची लागवड, तसेच लागवडीची कामे करत असतात. सध्या शेतीतील कामे जवळपास संपली असल्याने माळ, रानातील गवत कापून, त्याची विक्री करून मिळकत मिळविण्याचे चित्र सध्या दिसत आहे.

कोरोनाच्या पाश्वर्भूमीमुळे आपल्याला रोजगार कसा मिळणार? आपला उदरनिर्वाह कसा करायचा? ही चिंता सातत्याने भेडसावत असते. मात्र दरवर्षी पावसाळ्यामुळे तयार होणाऱ्या गवतामुळे आदिवासी यांना रोजगाराचा प्रश्न सुटत असतो. सध्या गवताला मोठी मागणी असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला निर्माण झालेले गवत आदिवासी कापून त्याची विक्री करीत आहे. शहरातील मोठे तबेलेवाले व इतर व्यक्ती मोठ्या प्रमाणात गवताची खरेदी करत असून यातून त्यांचा उदरनिर्वाह होत आहे.

- Advertisement -

पावसाळ्यातील शेतातील पिकांची लागवडीची कामे पूर्ण झाल्यानंतर जव्हार, मोखाडा तालुक्यातील नागरिकांच्या हाताला कोणतेही काम शिल्लक नसते. त्यामुळे कुटुंबावर रोजी रोटीचा प्रश्न उभा राहतो. असंख्य अडचणींचा सामना करत आयुष्याची गुजराण करण्यासाठी येथील नागरिक धडपडत असतो. जव्हार, मोखाडा तालुका पावसाचे माहेरघर गणला जातो. त्यामुळे पावसाळ्यात निसर्गाच्या किमयेमुळे माळ, रानावर सर्वत्र हिरवेगार गवत तयार झाले असल्याने हे गवत गाय, म्हैस आदी दुधाळ जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातून तबलाधारकांची या गवतासाठी मोठी मागणी असते. हे लक्षात घेऊन गेल्या काही दिवसांपासून येथील नागरिक गवताच्या विक्रीतून मिळकत मिळवताना दिसत आहे.

दिवसभर गवत कापून संध्याकाळपर्यंत गवताची गाडी भरून देण्याचा दिनक्रम सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. या गवताच्या विक्रीरून प्रति क्विंटल ९० ते १०० रुपये मिळत असून दिवसभरातून कसाबसा दोनशे ते अडीशे रुपयांचा रोजगार मिळत आहे. गवत विक्रीतून मिळणारी मिळकत तुटपुंजी जरी असली तर त्यातून दररोजचा खर्च भागला जातो आहे. त्यामुळे शेतीची कामे उरकल्यानंतर गवताच्या कापणीकडे येथील नागरिक लक्ष केंद्रित करत असतो. त्यातून मिळणाऱ्या मिळकतीतून समाधान मिळते. तालुक्यातील पुलाचीवाडी, गोमघर, शेलमपाडा, डोल्हारा, वाघ्याचीवडी, शेंड्याचीमेट, कडूचीवाडी, करोळ, राजेवाडी, उधळे या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गवताची विक्री होताना दिसते.

- Advertisement -

आदिवासी समाज हा दुर्गम अशा डोंगराळ भागामध्ये राहत असतो. पावसाळ्यात या माळरान अथवा डोंगराळ भागात मोठ्याप्रमाणावर गवत निर्माण होत असते. त्याच बरोबर ज्या शेतामध्ये लागवड केली नाही, त्या ठिकाणीसुद्धा गवत निर्माण होत असते. यांची विक्री करून घरचे भागवणे सोपे जात आहे.

हेही वाचा –

गहाळ वस्तू किंवा कागदपत्रांचे प्रमाणपत्र देण्यासाठी यापुढे शपथपत्राची गरज नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -