वसईः पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत कोट्यवधी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आलेले आहे. अर्थमंत्री गिरीश महाजन यांनीही अर्थसंकल्पात तशी तरतूद केलेली आहे. भविष्यात या सगळ्याचा फायदा भाजपला होणार आहे. आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीत भाजप हाच एक नंबरचा पक्ष असेल व भाजपचाच महापौर होईल, असा दावा माजी आमदार तथा भाजपचे पालघर प्रभारी नरेंद्र पवार यांनी नालासोपारा येथे बोलताना केला. महाराणा प्रताप स्मारक समिती आयोजित ‘तुळींज महोत्सवाची सांगता कोकणातील ‘दशावतारी नाटकाने झाली.
या सांगता समारंभाला प्रमुख पाहुणे नरेंद्र पवार अणि माजी आमदार विलास तरे उपस्थित होते. ब्रिटीशांनी आपल्यात पाश्चिमात्त्य संस्कृती रुजवली. त्यामुळे आपल्याला आपल्याच संस्कृतीचा विसर पडत गेला. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यासारख्या वीर पुरुषांचा इतिहास आपल्या भावी पिढीला सांगितला पाहिजे. त्यासाठी ‘तुळींज महोत्सवासारख्या संस्कृतीची जपणूक करणारे व हिंदुत्वाचा वारसा सांगणारे कार्यक्रम झाले पाहिजेत,अशी अपेक्षा पवार यांनी पुढे बोलताना व्यक्त केली. तुळींज महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि जोपासना करण्याचे महत्त्वपूर्ण काम महाराणा प्रताप स्मारक समितीच्या वतीने केले जात आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी यावेळी दिली.