श्रीवर्धन: २०१४ साली श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार सुनील तटकरे हे अर्थमंत्री असताना केंद्र शासनाच्या पर्यटन विकास निधीमधून श्रीवर्धन समुद्रकिनारी अंदाजे तीन किलोमीटर लांबीचा सुशोभित बंधारा बांधण्यात आला आहे. बंधारा कोठेही खचू नये म्हणून ३० ते ४० फूट खोल वाळू काढून त्यामध्ये मोठे दगड व काँक्रीट ओतण्यात आलेले आहे. मात्र समुद्रकिनारी खारी हवा असल्यामुळे या सुशोभित बंधार्यावर ठेवलेली बाकडी त्याचप्रमाणे विजेच्या दिव्यांची अवस्था गंज पकडून खराब झाली आहे. तर समुद्राच्या लाटांच्या मार्यामुळे पायर्यांवरती असलेल्या लाद्या देखील उखडून गेल्या आहेत. या बंधार्याच्या दुरुस्तीचे काम श्रीवर्धन नगर परिषदेने हाती घेतले असून काम अत्यंत संथ गतीने सुरू असून कामाचा दर्जा देखील निकृष्ट असल्याचे समोर आले आहे.
बंधार्यावरती सुरुवातीला पावसाचे पाणी समुद्रात निघून जाण्यासाठी गाळे ठेवण्यात आले होते. या गाळ्यांवरती लाकडी पट्ट्या ठोकण्यात आल्या होत्या. परंतु आठ वर्षानंतर या लाकडी पट्ट्या कुसून गेल्यामुळे त्या ठिकाणी आता स्लॅब घालण्यात येत आहे. मात्र स्लॅबसाठी वापरण्यात येणारे स्टील हे पूर्णपणे गंजलेले असून स्टीलला कोणत्याही प्रकारचा ऑइल पेंट देखील लावण्यात आलेला नाही. समुद्रकिनारी आरसीसी बांधकाम असल्यामुळे त्या ठिकाणच्या स्टीलला रंग लावणे गरजेचे आहे. परंतु नगर परिषदेकडून एकूणच या सर्व कामावरती दुर्लक्ष करण्याचा प्रकार सुरू आहे.
‘आय लव श्रीवर्धन’ सुशोभीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर
दुरुस्तीचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे येणार्या पावसाळ्या अगोदर काम पूर्ण होईल किंवा नाही याबाबत देखील साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. या सुशोभित बंधार्यावरती कोटा लाद्या बसवण्यात आल्या होत्या. परंतु काही ठिकाणी लाद्या खराब नसताना सुद्धा त्या काढून त्या ठिकाणी नवीन लाद्या बसविण्याचे काम सुरू आहे. सुशोभित बंधार्याजवळ ‘आय लव श्रीवर्धन’ असे सुशोभीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने दुरुस्तीच्या कामाकडे योग्य त्या पद्धतीने लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.