भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. बोर्डाने कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदाचा राजीनामा देण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम देखील दिला होता. मात्र कोहलीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने बीसीसीआयनेच त्याला कर्णधार पदावरून हटवले. तसेच देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधाराला अचानक कर्णधार पदावरून हटवल्याबद्दल क्रिकेट वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता यावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटले की, ” हा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीने संयुक्तपणे घेतला आहे. बीसीसीआयने विराटला टी-२० चे कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते, पण तो मान्य झाला नाही”. मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये दोन वेगळे कर्णधार नसावेत, असे निवडकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आता विराट कसोटी कर्णधार राहणार असून रोहित एकदिवसीय आणि टी-२० संघाची कमान सांभाळणार आहे. असे गांगुलीनी आणखी म्हंटले.
टी-२० विश्वचषकापूर्वी जेव्हा विराट कोहलीने टी-२० सारख्या सर्वात लहान फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले, तेव्हा गांगुलींनी सांगितले होते की, कोहलीने टी-२० चे कर्णधारपद सोडल्याने मला आश्चर्य वाटले होते. त्यांनी म्हंटले, विराटने हा निर्णय इंग्लंड दौऱ्यानंतर घेतला असेल. हा कोहलीचा वैयक्तिक निर्णय आहे. बीसीसीआयकडून कोहलीवर कोणताही दबाव नव्हता. आम्ही त्याला कर्णधारपद सोडण्याबाबत काहीही सांगितले नाही. आम्ही असे करत नाही कारण मी देखील एक खेळाडू आहे आणि मला ते चांगले समजते.
“माझ्या मते तिन्ही फॉरमॅटमध्ये इतके दिवस कर्णधार राहणे अवघड आहे. मी स्वतः सहा वर्षे भारतीय संघाचा कर्णधार होतो. बाहेरून सगळं छान दिसतं, पण आतून कर्णधाराच काय चाललंय, ते फक्त कर्णधारालाच माहीत असते. खूप अवघड काम आहे”. असे त्यांनी आणखी म्हंटले.
हे ही वाचा: http://Ravi Shastri : रोहित शर्माच्या कर्णधारपदावरून रवी शास्त्रींनी केले विधान; म्हणाले, तो तेच करतो जे…