यंदा भारतात होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान संघाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत सरकारने पाकिस्तानी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला भारतात येण्यासाठी व्हिसा देण्याची तयारी दर्शवली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ कौन्सिलची शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीदरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती वरिष्ठ कौन्सिलच्या सदस्यांना दिल्याचे समजते. यंदा टी-२० वर्ल्डकप भारतात होणार असून या स्पर्धेला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावांमुळे या दोन संघांमध्ये २०१३ नंतर द्विपक्षीय मालिका झालेली नाही. त्यातच पाकिस्तान संघाला वर्ल्डकपसाठी भारतात येऊ देण्यावरही प्रश्नचिन्ह होते. परंतु, आता केंद्र सरकारने पाकिस्तान संघाला व्हिसा देण्याची तयारी दर्शवली आहे.
सर्व अडचणी दूर करण्याचे आयसीसीला वचन
पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या व्हिसाबाबत ज्या अडचणी होत्या, त्या आता दूर करण्यात आल्या आहेत. मात्र, पाकिस्तानी चाहत्यांना भारतात प्रवेश मिळणार का, हे इतक्यात सांगता येणार नाही. याबाबत काही काळात निर्णय घेतला जाईल. मात्र, आम्ही सर्व अडचणी दूर करू असे आयसीसीला वचन दिले आहे. बीसीसीआय सचिवांनी याबाबतची माहिती वरिष्ठ कौन्सिलच्या बैठकीत दिली, असे वरिष्ठ कौन्सिलच्या सदस्यांकडून सांगण्यात आले.
अंतिम सामना अहमदाबादमध्ये
तसेच बीसीसीआयने वर्ल्डकपच्या सामन्यांसाठी नऊ ठिकाणेही निश्चित केली असून अंतिम सामन्याचे आयोजन अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये केले जाईल. अहमदाबाद व्यतिरिक्त दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, लखनौ आणि धरमशाला येथे या स्पर्धेचे सामने घेण्याची बीसीसीआयची योजना आहे.